तुर्की, 08 फेब्रुवारी : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भुकंपामुळे हाहाकार उडाला आहे. या दोन्ही देशामध्ये आतापर्यंत भूकंपामुळे मृतांची संख्या 7726 वर पोहोचली आहे. तर 42,259 लोक जखमी झाले आहे. दोन्ही देशांमध्ये आता 3 महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. भूकंपाने दोन्ही देशांमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 7726 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 42,259 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी भारताने दोन विमानांद्वारे मदत साहित्य आणि वैद्यकीय पथक पाठवले आहे. यानंतर तुर्कस्तानच्या नागरिक देखील भारतीयांचे आभार मानायला विसरले नाही.
भारताने तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी विविध उपकरणे पाठवली आहेत. भारताने पाठवलेल्या शोध आणि बचाव कर्मचार्यांचा एक गट, विशेष प्रशिक्षित श्वान पथक, ड्रिल मशीन, मदत सामग्री आणि औषधे घेऊन तुर्कीच्या एडनमध्ये दाखल झाले. भारताकडून तातडीने पाठवलेल्या या मदतीबद्दल तुर्कीने आभार मानले आहेत. तुर्कस्तानचे भारतातील राजदूत फिरत सुनेल यांनी न्यूज18 हिंदीशी विशेष संवाद साधताना सांगितले की, ‘मला खूप आनंद झाला आहे की भूकंपानंतर काही तासांतच भारताने या संकटात मदत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली आणि बचाव पथके तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला. आता आपण तुर्कीमध्ये भारतीय पथक पाहू शकतो, जे तेथे बचाव कार्यात मदत करत आहेत. तुर्कस्तानमधील सद्यस्थितीची माहिती देताना ते म्हणाले, ‘पहिल्यांदा 7.7 आणि नंतर 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तेव्हापासून आतापर्यंत 300 हून अधिक आफ्टरशॉक बसले आहेत. त्यांनी सांगितले की, या आपत्तीत 21 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि परिसरातील तीन विमानतळांचेही नुकसान झाले आहे. यासोबतच या परिस्थितीला सामोरे जाणे सोपे नसल्याचेही त्यांनी सांगितले. 14 हजारांहून अधिक अधिकारी आणि 5 हजाराहून अधिक लष्करी जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.