मुंबई, 16 जून : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) विराट कोहलीच्या (Virat Kohli) ऍटिट्यूडवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विराट कोहली मागच्या बऱ्याच काळापासून फॉर्ममध्ये नाही. अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ विराटला शतकही करता आलेलं नाही. 2021 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्याच राऊंडला बाहेर झाली, यानंतर विराटने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, मग विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, तसंच त्याने टेस्ट टीमची कॅप्टन्सीही सोडली. ‘कोहली अजूनही त्याच प्रेरणेने खेळत आहे का? जी त्याने सुरूवातीच्या वर्षांमध्ये दाखवली होती. कोहलीला पुन्हा नंबर 1 व्हायचं आहे का? का त्याने जे मिळवलं आहे, त्यातच तो संतुष्ट आहे. क्रिकेटमध्ये ऍटिट्यूड महत्त्वाचा ठरतो,’ असं आफ्रिदी समा टीव्हीशी बोलताना म्हणाला. ‘करियरच्या सुरुवातीला विराट कोहलीला जगात नंबर 1 व्हायचं होतं. तो याच प्रेरणेने आता क्रिकेट खेळत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्याकडे क्लास आहे, पण त्याला नंबर 1 व्हायचं आहे का? आपण आयुष्यात सगळं मिळवलं आहे, आता आराम करा आणि टाईमपास करा, असा विचार तो करत आहे का,’ अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली. विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 साली अखेरचं शतक झळकावलं होतं. बांगलादेशविरुद्ध झालेल्या डे-नाईट टेस्टमध्ये विराटने शेवटचं शतक केलं. आयपीएल 2022 मध्येही विराटची बॅट शांत राहिली, तीन वेळा तो गोल्डन डकवर आऊट झाला. आयपीएलच्या या मोसमात विराटने 16 सामन्यांमध्ये 341 रन केले, यात त्याला फक्त 2 अर्धशतकं करता आली.