मुंबई, 10 जून : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa 1st T20) 7 विकेटने पराभव झाला आहे. 212 रनचं आव्हान रोखणंही टीम इंडियाच्या बॉलर्सना शक्य झालं नाही. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 211 रन केले. या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलरनी केलेल्या कामगिरीसोबतच हार्दिक पांड्यावरही (Hardik Pandya) टीका करण्यात येत आहे. हार्दिक पांड्याने 12 बॉलमध्ये नाबाद 31 रनची आक्रमक खेळी केली, पण तरीही त्याने मैदानात केलेल्या कृत्यामुळे चाहते चांगलेच संतापले. हार्दिक पांड्याने 20 व्या ओव्हरमध्ये एनरिच नॉर्कियाचा पाचव्या बॉल मिड विकेटच्या दिशेने मारला. एक रन काढणं शक्य होतं तरीही हार्दिकने दिनेश कार्तिकऐवजी (Dinesh Karthik) स्वत:कडे स्ट्राईक ठेवला. यानंतर अखेरच्या बॉलला हार्दिकने दोन रन काढले. हार्दिक पांड्याने दिनेश कार्तिकचा अपमान केला आहे. त्याला स्ट्राईक न द्यायला तो काही 10 व्या आणि 11व्या क्रमांकाचा बॅट्समन नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
हार्दिकने घेतला बदला हार्दिक पांड्याने आपला भाऊ कृणाल पांड्याच्या अपमानाचा बदला घेतल्याच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटत आहेत. 2019 साली न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावेळीही अशीच घटना घडली होती. टीम साऊदीच्या शेवटच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकने शॉट मारला आणि रन काढायला नकार दिला. तेव्हा नॉन स्ट्रायकर एण्डला कृणाल पांड्या होता. अनेक चाहत्यांनी या मॅचचं आणि दिल्लीत झालेल्या मॅचमध्ये कनेक्शन जोडलं.