मोहाली, 4 एप्रिल : भारत विरूद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या टेस्टचा पहिला दिवस टीम इंडियानं गाजवला. मोहालीमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवसअखेर टीम इंडियानं 6 आऊट 357 रन केले. ऋषभ पंतची (Rishbah Pant) 96 रनची स्पेशल खेळी हे पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विराट कोहलीनं (Virat Kohli) शतक झळकावण्याची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. विराट कोहलीची 100 वी टेस्ट म्हणून या टेस्टला विशेष महत्त्व आहे. या खास कामगिरीसाठी विराटचा सुरूवातीला सत्कार करण्यात आला. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल या ओपनिंग जोडीनं टीम इंडियाला आक्रमक सुरूवात करून दिली. या दोघांनाही चांगल्या सुरूवातीचे रूपांतर मोठ्या स्कोअरमध्ये करता आले नाही. रोहित 29 तर मयंक 33 रन काढून आऊट झाला. विराटच्या शतकाकडं डोळे लावून बसलेल्या फॅन्सची निराशा झाली. मोहाली टेस्टमध्ये रंगात आलेला विराट 45 रन काढून आऊट झाला. विराट ज्या पद्धतीनं आऊट झाला ते पाहून अनेक फॅन्सचा डोळ्यावर विश्वास बसला नाही.श्रीलंकेचा स्पिनर लसिथ एबुलदेनियानं बॉल बॅकफुटवर खेळण्याचा विराटचा प्रयत्न फसला. त्याला काही कळण्याच्या आता बॉल विराटच्या बॅटला चकवून स्टंपला लागला होता. IND vs SL : विराट कोहलीच्या विकेटची झाली होती भविष्यवाणी, वाचून बसेल धक्का विराट कोहली आऊट झाल्यानंतर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर बॅटींगला आला. त्यानंतर लगेच हनुमा विहारी आऊट झाला. पंतनं या परिस्थितीमध्ये सुरूवातीला सावध खेळ केला. त्यानं श्रेयस अय्यरसोबत पाचव्या विकेटसाठी 53 रनची पार्टनरशिप केली. श्रेयस अय्यर आऊट झाल्यानंतर पंतची जडेजासोबत जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 104 रनची भागिदारी करत टीम इंडियाची स्थिती भक्कम केली आहे. पंतने त्याचे अर्धशतक 73 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं पूर्ण केले होते. अर्धशतकानंतर त्याने वेग वाढवला. पंतनं 97 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 96 रन केले. पंत आऊट झाला असला तरी त्याने पहिल्या दिवशी टीम इंडियाला भक्कम स्कोअर उभा करून दिला आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रविंद्र जडेजा 45 आणि आर. अश्विन 10 रन काढून खेळत होते. श्रीलंकेकडून एबुलदेनिया सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्याने 2 विकेट्स घेतला. श्रीलंकेची ही 300 वी टेस्ट आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही या मॅचचं महत्त्व मोठं आहे.