अहमदाबाद, 25 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात खराब झाली आहे. दुसऱ्या दिवशी 3 आऊट 99 या स्कोअरवरुन भारतानं पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर थोड्याच वेळात तीन आघाडीचे बॅट्समन आपले आऊट झाले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 7 रन काढून सर्वप्रथम आऊट झाला. त्याला जॅक लीचनं आऊट केलं.
अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर जॅक लीचनं रोहित शर्माला (Rohit Sharma) आऊट करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. रोहितनं अहमदाबादच्या फिरत्या पिचवर 66 रन काढले. सुरुवातीपासून आत्मविश्वासनं खेळणाऱ्या रोहितचा लीचला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि तो आऊट झाला.
ऋषभ पंतही (Rishabh Pant) फार कमाल करु शकला नाही. पंत फक्त 1 रन काढून जो रुटच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यापाठोपाठ वॉशिंग्टन सुंदरलारी जो रुटनं शून्यावर आऊट केलं. इंग्लंडच्या इनिंगप्रमाणे भारताच्या इनिंगमध्येही स्पिन बॉलर्सचा दबदबा आहे. भारताच्या आठ पैकी सात विकेट्स या स्पिनर्सनं घेतल्या आहे. इंग्लंडचा कॅप्टन जो रुटनं तर शून्य रन देऊन तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याआधी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडला भारताने 112 रनवर ऑल आऊट केले होते. भारताकडून अक्षर पटेल (Axar Patel) ने 6, अश्विनने 3 तर आपली 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांत शर्माने एक विकेट घेतली. इंग्लंडकडून झॅक क्रॉलेने सर्वाधिक 53 रनची खेळी केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) च्या दृष्टीने ही टेस्ट दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातली ही टेस्ट डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवण्यात येत आहे. या मॅचसाठी भारताने टीममध्ये दोन तर इंग्लंडने चार बदल केले.