पैसे सगळ्यांसाठी महत्वाचे असतात. मग तो गरीब असू देत किंवा श्रीमंत. तसे पाहाता आता लोकांचा बराचसा व्यवहार हा डिजिटल झाला आहे, त्यामुळे बहुतांश लोक आपल्याजवळ पैसे बाळगत नाहीत. पण असं असलं तरी एक काळ होता जेव्हा लोक खिशात पैसे ठेवायचे. या पैशांच्या नोटींवर बऱ्याच गोष्टी पेनाने लिहिलेल्या तुम्ही पाहिल्या असतील.
अगदी फोन नंबरपासून ते नाव किंवा जोडीदारावरील प्रेम व्यक्त करण्यापर्यंत अनेक गोष्टी नोटींवर लिहिलेल्या जायच्या. पण यामुळे बऱ्याचदा लोकांना अशा नोटा वापरताना समस्यांना सामोरं जावं लागलं, कारण मधल्या काळात अशी एक बातमी समोर आली होती की जर नोटीवर काही लिहिलं असेल तर ती नोट चलनात राहाणार नाही.
त्यामुळे अनेक लोक घाबरले. लोकांकडे काही लिहिलेल्या नोटा अशाच राहिल्या आहेत किंवा मिळाल्या आहेत, अशा लोकांनी काय करावं? जर या नोटा चालल्या नाहीत तर नुकसान होणार, मग काय करायचं? असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. चला मग हे किती खरं आणि किती खोटं याबद्दल जाणून घेऊ.
लिहिलेल्या नोट्स वैध ठरणार नाहीत का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशी सूचना जारी करण्यात आल्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे. अशा स्थितीत आता लोक विचारू लागले आहेत की, नोटेवर काही ही लिहिल्याने ती अवैध ठरते का? लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या अशा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सरकारच्या पीआयबी फॅक्टचेकने दिली आहेत.
PIB FactCheck च्या ट्विटनुसार, "काहीही लिहिलेल्या नोटा अवैध नाहीत आणि तसेच त्या चलनात राहातील." एजन्सीने पुढे सांगितले की, 'क्लीन नोट पॉलिसी' अंतर्गत लोकांना चलनी नोटांवर लिहू नये असे आवाहन केले जाते कारण यामुळे नोटा खराब होण्यापासून ते रोखू शकतात. पण म्हणून त्या अवैद्य होत नाहीत.