स्मार्टफोन काजच्या काळात कोणाकडे नाही? अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोक फोन वापरतात. फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सगळ्याच कामासाठी आपण त्याच्यावर अवलंबून असतो. मग ते पैसे पाठवायचे असोत, किंवा सकाळी उठण्यासाठी अलार्म लावायचा असो.
पण तुम्ही दररोज वापर असलेल्या फोनबद्दलची एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहितीय का? तुम्हाला जर विचारलं की इतर वस्तूं प्रमाणे स्मार्टफोनला एक्सपायरी डेट असते का? तुमचा फोन एक्सपायर होऊ शकतो का? चला जाणून घेऊ की फोनची एक्सपायरी म्हणजे नक्की काय?
स्मार्टफोनचा विचार केला तर तो कितीही वापरला तरी तो कालबाह्य किंवा एक्सपायर होत नाही. वास्तविक स्मार्टफोनची एक्सपायरी डेट नसते. पण अशी काही कारणे आहेत ज्यांमुळे स्मार्टफोन खराब होतो.
स्मार्टफोनचे आयुष्य किती असते? जर तुम्ही ब्रँडेड कंपनीचा स्मार्टफोन वापरत असाल, तर तो तुम्हाला काही त्रास न होता अनेक दशकांपर्यंत सेवा देईल. स्मार्टफोनमध्ये अशा चिप्स आणि पार्ट्स वापरले जातात जे वर्षानुवर्षे चालू राहतात.
मात्र, स्मार्टफोन बनवणारे लोक आता हुशार झाले आहेत. आजकाल कंपन्या 2-3 वर्षांनंतर स्मार्टफोनला सॉफ्टवेअर अपडेट देणे बंद करतात. त्यामुळे जुने स्मार्टफोन वापरता येत नाहीत, तुम्ही तो वापरण्याचा प्रयत्न केलात तरी तो फोन हँग होऊ लागतो, त्यामध्ये काही ऍप्स येत नाहीत, शिवाय जे ऍप आहेत, ते नीट चालत नाहीत अशा समस्या उद्भवू लागतात. तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या फोन खराब झाला आहे आणि हीच ती वेळ असते फोन बदलण्याची.
पण हे देखील लक्षात घ्या की प्रत्येक वेळी हे एकच कारण नसू शकतं, कधीकधी फोनमधील तांत्रिक बिघाडामुळे किंवा मेमरी फुल झाल्यामुळे देखील फोन हँग होऊ शकतो. कंपनी हे मुद्दाम करतात, ज्यामुळे काही वर्षांनी तुम्हाला पुन्हा नवीन मोबाईल खरेदी करण्याची गरज भासेल.
स्मार्टफोन कधी बदलायचा? तुम्हाला तुमचा स्मार्टफोन कधी बदलायचा आहे? हे तुमच्यावर अवलंबून आहे. बरेच लोक स्मार्टफोन बदलतात आणि 3 ते 4 महिन्यांत बाजारात आलेला नवीन स्मार्टफोन खरेदी करतात. पण असे पाहिले तर यात काही अर्थ नाही. असे केल्याने तुमचे बजेटही बिघडते.
तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत स्मार्टफोन वापरण्यायोग्य आहे तोपर्यंत त्याचा वापर केला पाहिजे. गरज भासल्यास फोनची खराब बॅटरी आणि स्क्रीन बदलता येईल.