मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये देवी अहिल्या विद्यापीठ परिसरात अचानक बँड, बाजा, पंजाबी ढोल आणि घोडा घेऊन नवरदेव दाखल झाला तेव्हा सर्वजण अगदी चकीत झाले. विद्यापीठात लग्नाची वरात? असा प्रश्न सर्वांना पडला. त्यातच 60 वर्षांचा नवरा मुलगा दिसला. मग काय चर्चेपे चर्चा सुरू झाली ना राव. मात्र हे लग्न नसून काहीतरी वेगळंच आहे...असं चर्चे-चर्चेतून सर्वांना कळलं.
खरंतर विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याच्या निरोप समारंभासाठी ही लग्नसोहळ्यासारखी व्यवस्था करण्यात आली होती. सामान्यतः शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांना फुलांचा हार घालून त्यांचं स्वागत केलं जातं आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन निरोप दिला जातो. मात्र या निरोप समारंभाची तयारी काही औरच होती.
कर्मचारी बाबू बन्नेसिंह सोलंकी यांचा हा निरोप सोहळा होता. त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय संकुलात वाहनचालक म्हणून सेवा दिली. त्यामुळेच विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये त्यांना बँड-बाजाच्या गजरात निरोप देण्यात आला.
समारंभासाठी दोन घोडे मागवण्यात आले होते. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला घोड्याने दोन पाय वर करून सलामी दिली. त्यानंतर या कर्मचाऱ्याने घोड्यावर स्वार होऊन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला. हे दृश्य पाहायला अनेक विद्यार्थ्यांनी त्याठिकाणी गर्दी केली होती.
विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. रेणू जैन या कार्मक्रमात सामील झाल्या होत्या. त्यांचे आगमन झाल्यानंतर विद्यापीठाच्या सभागृहात औपचारिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. निवृत्तीचा हा कार्यक्रम संपूर्ण कॅम्पसमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.