भारतीय संघाने अखेरची आयसीसी स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती. त्यानंतर गेल्या दहा वर्षात एकदाही टीम इंडियाला विजेतेपद पटकावता आलेलं नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभूत व्हावं लागलं. 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव अवघ्या 234 धावात आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने आय़सीसीच्या चारही चषकांवर नाव कोरलं असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ आहे.
फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथन आणि ट्रेव्हिस हेडने शतक झळकावलं होतं. तर प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ 296 धावा करू शकला. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर यांच्या भागिदारीने फॉलोऑनची नामुष्की टळली. तर ऑस्ट्रेलियाने दुसरा डावा 8 बाद 270 धावांवर घोषित केला. यानंतर मैदानात उतरलेल्या भारताची आघाडीची फळी पुन्हा एकदा अपय़शी ठरली.
गेल्या दहा वर्षात भारतीय संघ 9 आय़सीसी स्पर्धांमध्ये खेळला. त्यात 4 फायनल आणि 4 सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता भारतीय संघावर चोकर्सचा शिक्का बसला आहे. 2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2014 मध्ये लंकेविरुद्ध टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय संघ पराभूत झाला. तर 2016 मध्ये सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने हरवलं होतं.
2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला दुसऱ्या फेरीतूनच बाहेर पडावं लागलं होतं. पाकिस्तानने वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं होतं. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने भारताला10 विकेटने धूळ चारली होती. त्यानंतर 2022 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून सेमीफायनलमध्ये 10 विकेटने दारूण पराभव झाला होता.
एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 2015 मध्ये भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच हरवलं होतं. त्यानंतर2019 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला होता.
चॅम्पियन्स ट्रॉफीत 2017 च्या फायनलमध्ये भारताला पाकिस्तानने 280 धावांनी हरवलं होतं. फखर जमानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने 338 धावा केल्या होत्या. त्यानतंर भारतीय संघ 158 धावांत गुंडाळला होता. मोहम्मद आमिरने भारताच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडलं होतं.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ पहिल्या हंगामात पॉइंट टेबलमध्ये टॉपला होता. पण 2021 ला इंग्लंडच्या साउदम्प्टनच्या मैदानावर भारताला न्यूझीलंडने हरवलं होतं. यंदाच्या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर होता. पण फायनलमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाची घोर निराशा झाली.
भारताला आता घरच्या मैदानावर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटर निवृत्ती घेऊ शकतात. त्यामुळे या स्पर्धेकडे टीम इंडियाचे लक्ष असणार आहे. दरम्यान दुखापतीमुळे बाहेर असलेले जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, केएल राहुल हे पुन्हा संघात दिसतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.