भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून इंग्लंमध्ये ओव्हल मैदानावर अंतिम सामना होणार आहे. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायला हवी यावर दिग्गजांकडून मत व्यक्त केलं जात आहे. हरभजन सिंग ते मोहम्मद कैफपर्यंत अनेकांनी भारताचा फिरकीपट्टू आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलंय. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 450 हून अधिक विकेट घेतल्या आहेत.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन सिंगने म्हटलं की, संघात कुणाला संधी मिळेल हे सर्व खेळपट्टीवर अवलंबून असेल. जर खेळपट्टीवर गवत कमी असेल आणि चांगलं ऊन पडलं तर भारतीय संघ दोन फिरकीपट्टूंसह उतरे. पण जर असं नाही झालं तर तीन वेगवान गोलंदाज आणि रविंद्र जडेजाला संधी द्यायला हवी. तर पाचवा गोलंदाज म्हणून शार्दुलला संघात ठेवावं. तो फलंदाजीही करतो.
भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनेही हरभजन सिंगच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली. तो म्हणाला की, सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जडेजा तर आठव्या नंबरवर परिस्थितीनुसार अश्विन किंवा शार्दुलला संधी मिळू शकते. फिरकीला अनुकूल खेळपट्टी असल्यास अश्विनला संधी द्यायला हवी, कारण ऑस्ट्रेलियाकडे वॉर्नर, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा हे डावखुरे फलंदाज आहेत.
मोहम्मद कैफ म्हणाला की, प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादवला घेतलं पाहिजे. जूनच्या सुरुवातीला सामना असल्यानं ३ वेगवान गोलंदाजांची गरज भासेल. याशिवाय रविंद्र जडेजाही असायला हवा. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असेल तर अश्विनच्या जागी पाचवा गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर संघात असू शकतो असंही कैफने म्हटलं.
यष्टीरक्षक म्हणून कुणाला संधी द्यायची यावर हरभजन सिंग म्हणाला की, अनुभवी ऋद्धिमान साहा असता तर त्याला संधी दिली असती. केएल राहुलसुद्धा दुखापतीने बाहेर आहे. तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर उपयुक्त ठरला असता. माझ्या मते इशान किशनच्या जागी केएस भरतला संधी मिळायला हवी. तर कैफ म्हणाला की, केएस भरतऐवजी इशान किशन असायला हवा असं वाटतं. जुन्या चेंडूवर आक्रमक फलंदाजी करणारा खेळाडू इथे असायला हवा असंही पुढे कैफने सांगितलं.