महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का बसला. अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ही धावबाद झाल्यानंतर भारतीय संघावर दबाव वाढला.
हरमनप्रीत बाद झाल्यावर ऋचा घोष, दिप्ती यांनी भारताला विजयाच्या जवळ नेले पण शेवटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या पराभवासह भारताचं पुन्हा एकदा विश्वविजेता होण्याचं स्वप्न भंग पावलं. तर ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
हरमनप्रीत धावबाद : सेमीफायनल भारत सहज जिंकणार असं वाटत असतानाच १५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हरमनप्रीत धावबाद झाली. क्रीजमध्ये सहज पोहचेल असं वाटणाऱ्या हरमनप्रीतची बॅट जमीनीत रुतल्यानं वेळेत क्रीजमध्ये पोहोचू शकली नाही. त्यामुळे ५२ धावांवर हरमनप्रीत बाद झाली आणि भारताच्या सेमीफायनल जिंकण्याच्या आशा मावळल्या.
आघाडीची फलंदाजी ढेपाळली : पुन्हा एकदा भारताच्या आघाडीच्या फलंदाजीला खिंडार पडले. शफाली वर्मा, स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया स्वस्तात बाद झाल्या. तिघींनी मिळून फक्त १५ धावा केल्या. या तिघी बाद झाल्यानंतर जेमिमाह आणि हरमनप्रीत यांनी डाव सावरला पण पुन्हा भारताला पुनरागमन करता आलं नाही.
१९ वे षटक : ऑस्ट्रेलियाच्या संघाला अखेरच्या दोन षटकात १९ धावा वाचवायच्या होत्या तर भारताला विजयासाठी २० धावा हव्या होत्या. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने जेस जोनासनकडे चेंडू सोपवले. तिने या षटकात फक्त ४ धावा देल्या आणि अखेरच्या चेंडूवर स्नेह राणाची विकेट घेतली. यानंतर अखेरच्या षटकात एश गार्डनरने तिचं काम चोखपणे पार पाडलं.
गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण : भारताने सामन्यात फक्त ५ गोलंदाज खेळवले आणि या सर्व गोलंदाजांनी ४ षटकात प्रत्येकी किमान ३० धावा दिल्या. यात सर्वात महागडी रेणुका सिंह ठरली. तिने शेवटच्या षटकात १८ तर एकूण ४१ धावा दिल्या. यासोबत फिल्डिंग करताना सामन्यात झेल, स्टम्पिंगच्या संधी सोडल्या आणि गचाळ क्षेत्ररक्षण करत धावाही दिल्या.
ऋचा घोषची विकेट : भारताच्या डावातील हरमनप्रीतनंतर ऋचा घोषची विकेट मोठा टर्निंग पॉइंट ठरली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर जोपर्यंत ऋचा घोष मैदानात होती तोपर्यंत भारत जिंकेल असं वाटत होतं. पण १६ व्या षटकात अखेरच्या चेंडूवर डार्सी ब्राउनने तिला बाद केलं. उंच फटका मारण्याच्या नादात ती झेलबाद झाली. सीमारेषेवर ताहिला मॅक्ग्राने तिचा झेल घेतला.