सरफराज खानने रणजी ट्रॉफीच्या मागच्या तीन मोसमांमध्ये 2,566 रन केल्या आहेत. प्रथम श्रेणी करिअरच्या 37 सामन्यांमध्ये त्याने 79.85 च्या सरासरीने रन केले आहेत. एवढच नाही तर तो दोनवेळा भारताकडून अंडर-19 वर्ल्ड कप खेळला आहे, पण वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची निवड झालेली नाही. पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 42 च्या सरासरीने रन करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. (Sarfaraz Khan/Instagram)
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सरफराज खानची निवड न होण्यामागची कारणं सांगितली आहेत. सरफराजला टीममध्ये वारंवार संधी मिळत नसण्यामागे फक्त क्रिकेट हे कारण नाही. अशी बरीच कारणं आहेत, असा खुलासा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केला आहे. (Sarfaraz Khan/Instagram)
लागोपाठ दोन मोसमांमध्ये 900 पेक्षा जास्त रन करणाऱ्या खेळाडूकडे दुर्लक्ष करायला निवड समिती मूर्ख आहे का? टीममध्ये निवड न होण्यामागचं एक कारण त्याचा फिटनेस आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा नाही, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला. (Sarfaraz Khan/Instagram)
फिटनेससोबतच बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सरफराजच्या वर्तणुकीवरही आक्षेप घेतले. मैदानाच्या आत आणि बाहेर त्याची वर्तणूक योग्य नाही. त्याच्या काही गोष्टी आणि हावभाव अनुशासनाच्या दृष्टीने चांगले नाहीत. सरफराज आणि कोच असलेले त्याचे वडील नौशाद खान या गोष्टींवर काम करतील, अशी अपेक्षा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. (Sarfaraz Khan/Instagram)
यावर्षी रणजी ट्रॉफीच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध शतक केल्यानंतर सरफराजने आक्रमक सेलिब्रेशन केलं, जे निवड समितीला पटलं नाही. त्यावेळी निवड समितीचे तत्कालिन प्रमुख चेतन शर्मा स्टेडियममध्ये होते. याआधी 2022 साली रणजी ट्रॉफी फायनलमध्येही त्याच्या वर्तणुकीमुळे मध्य प्रदेशचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित नाराज झाले होते. (Sarfaraz Khan/Instagram)
सरफराजला खूप मेहनत करावी लागेल, तसंच वजन कमी करून फिटनेस दाखवावा लागेल. निवड होण्यासाठी फक्त बॅटिंग फिटनेस हा मापदंड नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.