कायद्याने गुन्हा असला तरी आजही अनेक ठिकाणी 'बालविवाह' होतात. बिहारच्या मधुबनातून असाच एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं एका 50 वर्षीय वयस्कर व्यक्तीशी जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत ही निरागस नवरी बोहोल्यावर चढली. ती ओक्साबोक्शी रडत होती, लग्न लावून देऊ नका म्हणून जोरजोरात किंचाळत होती. मात्र तिचा आवाज समाजाने दाबून टाकला.
'मला हे लग्न नाही करायचंय. लग्न झालं तर मी मरून जाईन', असं ती जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगत होती...पण तिचं कोणीच काही ऐकून घेतलं नाही. नातेवाईकांनी हात पकडले, मान आवळली, तिचा दम घोटून भांगात कुंकू भरण्याचा विधी पार पडला.
गुरूजीनेही तिच्यावर डोळे वटारले, तिला ओरडू लागले. ती रडत होती तरी त्यांनी मंत्रोच्चार सुरूच ठेवले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, याविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
लग्न विधिवत पार पडलं, सनई-चौघडे वाजले, नातेवाईक नाचू लागले, मात्र 'ती'ला पूर्णतः अंधार दिसत होता. रडून रडून पाणी सुकलेल्या तिच्या डोळ्यांपुढे फक्त अंधार पसरला होता.