दिग्दर्शक अनुराग कश्यपने काही दिवसांपूर्वी 'द केरळ स्टोरी' बद्दल वीट केलं होतं. या ट्विटमध्ये 'तुम्ही या चित्रपटाशी सहमत असाल किंवा नसाल, हा प्रचारात्मक चित्रपट असो वा नसो, कोणी दुखावले असो वा नसो, पण चित्रपटावर बंदी घालणे चुकीचे आहे.' असं म्हटलं होतं.
एका मुलाखतीदरम्यान अनुराग कश्यपच्या ट्विटबद्दल नवाजुद्दीनला सांगण्यात आले, तेव्हा तो चित्रपट निर्मात्याशी थोडासा सहमत असल्याचे दिसून आले. परंतु नंतर त्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, 'चित्रपट किंवा कादंबरीमुळे कोणी दुखावले जात असेल तर ते चुकीचे आहे. प्रेक्षकांच्या भावना दुखावण्यासाठी आम्ही चित्रपट बनवत नाही.' असंही तो म्हणाला.
नवाजुद्दीनने याबाबत बोलताना पुढे म्हणाला की, 'चित्रपटाने समाजात शांतता आणि प्रेम वाढवले पाहिजे आणि ते करणे ही आपली जबाबदारी आहे. एखादा चित्रपटलोकांमध्ये फूट पाडत असेल आणि सामाजिक सलोखा नष्ट करत असेल तर ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे' असं तो म्हणाला आहे.
नवाजुद्दीन शेवटी म्हणाला, 'आपल्याला सगळ्यांना जोडायचं आहे, तोडायचं नाही.' तसेच चित्रपटावरील बंदीवर नवाजुद्दीनने 'जगात अशी कोणतीही गोष्ट नाही ज्यावर बंदी घातली पाहिजे.' असं मत व्यक्त केलं आहे.
'द केरळ स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अदा शर्मा स्टारर चित्रपटात केरळमधील महिलांना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते आणि दहशतवादी संघटना 'इसिस'मध्ये कसे भरती केले जाते हे दाखवण्यात आले आहे.
'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल सांगायचे तर, तो सध्या त्याचा पुढचा चित्रपट 'जोगिरा सा रा रा'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे जो 26 मे रोजी रिलीज होणार आहे. 'जोगिरा सा रा रा' हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये नेहा शर्माचीही महत्त्वाची भूमिका आहे.