26 ऑक्टोबर : कुणी काहीही म्हटलं, काहीही दावा केला तरी काँग्रेसच्या 26 आणि राष्ट्रवादीच्या 22 जागा राहतील याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही असं स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभेच्या जागेसाठी उभे राहणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय ते फक्त यापुढे राज्यसभेच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या दोन जागेवर उभे राहतील अशी माहितीही अजित पवारांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडले. काहीही झालं तर राष्ट्रवादीनं केलं बरोबर झालं तर आम्ही केलं आणि प्रमुखांनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करायाचा असं सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. सातार्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा पार पडला.या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावरील आरोपांचं जोरदार खंडन केलं. सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीची नाहक बदनामी करण्यात आल्याचा सूर जयंत पाटील आणि आर.आर पाटील या नेत्यांनी लावला. दुष्काळ निवारणात जलसंधारणाची कामं करुन काँग्रेसनं स्वताची पाठ थोपटली, पण त्याचवेळी सिंचनाच्या घोटाळ्यात राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, अशी अप्रत्यक्ष टीका जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केली.