नवी दिल्ली, 25 जून: अमेरिकेकडून इराणवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे भारतातील इंधनाचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण संयुक्त अरब अमिरात (UAE)ने यासंदर्भात भारताला मोठा दिलासा दिला आहे. इराणवरील निर्बंधामुळे इंधना पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्यास तो भरून काढला जाईल असे आश्वासन युएईने भारताला दिले आहे. UAEचे भारतातील राजदूत अहमद अल बन्ना यांनी ही माहिती दिली. इराण आणि अमेरिकेतील तणावावर भारताने चिंता व्यक्त केली आहे. होर्मुजमधील जलडमरुम येथे झालेल्या घटनांवर भारताने काळजी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना बन्ना म्हणाले, इराणवरील निर्बंधामुळे भारताला इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यास UAEकडून त्याची पूर्तता केली जाईल. याआधी अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर UAEने भारताला मदत केली होती. त्यामुळे आम्ही आता देखील भारत सरकारला यासंदर्भात आश्वासन देतो. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या सवलतीनंतर भारताने मे महिन्यापासून इराणकडून इंधन आयात रोखली होती. इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडल्यापासून दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. त्याआधी इंधनाचे टॅकर पेटवून देण्याच्या घटना घडली होती. यासाठी देखील अमेरिकेने इराणला जबाबदार धरले होते. या सर्व पार्श्वभूमीवर भारताने इंधन आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी युद्धनौका तैनात केल्या आहेत. SPECIAL REPORT: परदेशी पर्यटकांना का पडते धारवीची भुरळ?