अगरतला, 22 नोव्हेंबर : त्रिपुरात (Tripura) राजकीय घडामोडींचा चांगलाच वेग आलेला दिसतोय. पश्चिम बंगालनंतर (West Bengal) आता त्रिपुरात तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप (BJP) यांच्यात टोकाचा संघर्ष (Clash) बघायला मिळतोय. विशेष म्हणजे त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बिप्लब कुमार देब (Biplab Kumar Deb) यांना धमकी दिल्याप्रकरणी तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सयानी घोष (Sayani Ghosh) यांना अटक करण्यात आली आहे. सयानी घोष या टीएमसीच्या बंगालच्या राज्य सचिव आहेत. घोष यांनी शनिवारी (19 नोव्हेंबर) रात्री एका बैठकीदरम्यान त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. घोष यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर टीएमसीच्या नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अटकेच्या निषेधार्थ टीएमसीचे खासदार दिल्लीत आंदोलन करणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, सयानी यांच्यावर मुख्यमंत्र्याविरोधात केलेल्या वक्तव्यांप्रकरणी हत्येचा प्रयत्न करण्याच्या कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन समुदायांमध्ये शत्रूत्व निर्माण करण्यासाठी त्यांना भडकविण्याच्या प्रयत्नांच्या आरोपांखाली कलम 153 ए अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या एका सभेदरम्यान दगडफेक केली, असाही एक आरोप आहे. पोलिसांनी सुरुवातीला सयानी यांना चौकशीसाठी बोलावलं बोलावलं होतं. पण चौकशीसाठी हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा : पठाणकोटमध्ये रात्रीचा थरार, अज्ञातांकडून ग्रेनेड हल्ला, नंतर पोलिसांची शोध मोहीम
सयानी यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर टीएमसीने नेते आक्रमक झाले आहेत. ते आज दिल्लीत आंदोलन करणार आहेत. टीएमसीचे जवळपास 10 ते 12 खासदार आज दिल्लीत धरने आंदोलनाला बसणार आहेत. टीएमसीच्या खासदार सौगत रॉय यांनी याबाबत माहिती दिली आहे. आम्ही पक्ष कार्यालयात भेटू. त्रिपुरा पोलिसांनी टीएमसीच्या युवा काँग्रेस प्रमुख सयानी घोष यांना अटक केलीय. त्या घटनेचा आम्ही निषेध करु, अशी प्रतिक्रिया सौगत रॉय यांनी दिली. दुसरीकडे टीएमसीचे काही खासदार आज त्रिपुरात जो हिंसाचार सुरु आहे त्या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बातचित करणार आहेत. त्यासाठी त्यांनी अमित शाह यांची वेळ मागितली आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शेकडो कोटींच्या आरोपांनंतर सोमय्या आता दिल्लीत
दुसरीकडे त्रिपुरा पोलिसांनी टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या उत्तर पूर्व राज्याच्या प्रस्तावित दौऱ्यासाठी अनुमती दिलेली नाही. पोलिसांनी कोरोना संकटाचं कारण सांगत त्यांच्या दौऱ्याला अनुमती दिलेली नाही. पण टीएमसीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या विषयावर भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. “आमचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आमच्या कार्यकर्त्यांसोबत उभे राहण्यासाठी समवारी त्रिपुऱ्याला पोहोचणार. त्यांना रविवारी अनुमती दिली गेली नाही. आम्ही शेवटपर्यंत लढू”, असं टीएमसीच्या ट्विटर अकाउंटवर म्हटलं आहे.