मुंबई, 20 फेब्रुवारी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जीएसटी भवनातील शिपाई कुणाल जाधव यांचा सत्कार करण्यात आला आहे. मुंबईतील माझगाव इथे जीएसटी भवनात लागलेल्या आगीत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. कुणाल जाधव यांचा सोमवारी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. त्यांनी कुणाल यांच्या धाडसाचं तोंडभरून कौतुकही केलं. सोमवारी दुपारच्या सुमारास जीएसटी भवनाला लागलेल्या आगीत कुणाल जाधव यांनी जीव धोक्यात घालून तिरंगा उतरवला. कुणाल यांनी प्रसंगावधान राखत तिरंग्याला आगीची, धुराची झळ बसू न देता सुरक्षित बाहेर काढलं त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहेच. मात्र त्याच्या या धाडसाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. कुणाल यांच्या धाडसाचं कौतुक सहाकाऱ्यांनीच नाही तर संपूर्ण सोशल मीडियावरही केलं जात आहे.
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्याला 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आग लागली होती. धुराचे लोळ निघताच कर्मचाऱ्यांना आपापल्या मजल्यावरून खाली जायला सांगितलं. जिथे सगळे कर्मचारी आपल्या घरी जात होते, तिथे मात्र कुणाल यांच्यासारखे 10-12 जण मात्र पार्किंगमधील गाड्या हटवण्यासाठी प्रयत्न करत होते. अग्निशमन दलाच्या गाड्यांना रस्ता करून देण्यासाठी ही सगळी कसरत होती. पण तितक्यात कुणाला यांच्या मागून आवाज आला, अरे तिरंग्याचं काय? कुणाल यांनी क्षणाचाही विचार न करता तो झरझर जिन्याकडे धावला. आठ मजले तो एका दमात चढला खरा. पण जिथे आग लागली हाती त्या नवव्या मजल्यावर जाताच धुराचे लोळ त्यांच्याकडे येऊ लागले. कुणाल यांनी जीवाची पर्वा न करता मजले चढायला सुरुवात केली. तिथे त्यांचे आणखी 2 सहकारी त्यांना भेटले. मग या तिघांनी तिरंग्याला सन्मानपूर्वक खाली उतरवलं आणि आपल्या खांद्यावर टाकून थेट ते पहिला मजल्यापर्यंत आले. त्यांच्या धाडसाचं कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केलं आहे.