मुंबई, 28 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यामुळं सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आलं आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ची मुदत तीन महिने वाढवली आहे. त्यामुळं तब्बल 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत राहील. दरम्यान या योजनेचा कालावधी वाढण्याचे संकेत आधीपासूनच मिळत होते. मोदी सरकार 30 सप्टेंबरनंतरही गरिबांना मोफत रेशन देण्यासाठी PMGKAY योजनेचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सनी दिली होती. परंतु त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान आजच्या कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी तीन महिने वाढवण्यात आला आहे. त्यामुळं 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळत राहणार आहे. PMGKAY योजना काय आहे?
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आली.
लॉकडाऊन कालावधीत लोकांचा त्रास कमी करण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत समाविष्ट असलेल्या सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्य मोफत उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश होता.
2021-22 मध्ये सुरू असलेल्या कोविड-19 संकटामुळे केंद्राने एप्रिल 2021 ते मे आणि जून 2021 (फेज-III) आणि जुलै ते नोव्हेंबर 2021 (फेज-IV) अशी अनुक्रमे दोन आणि पाच महिन्यांसाठी वाढवली.
ही योजना पुन्हा डिसेंबर 2021 ते मार्च 2022 (टप्पा-V) पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर केंद्राने 26 मार्च रोजी गरिबांना 80,000 कोटी रुपये खर्चाचे 5 किलो धान्य मोफत देण्याची योजना सहा महिन्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.