नवी दिल्ली, 25 मार्च: गेल्या काही दिवसांपासून नोकरदार वर्गामध्ये अशी चर्चा सुरू आहे की, आठवड्याचे कामकाज 4 दिवस होऊन (4 days in a Week) 3 दिवस सुट्टी मिळू शकते. केंद्र सरकार (Government of India) याबाबतीत योजना आखत असल्याचीही माहिती समोर आली होती. अशी देखील चर्चा होती की, आठवड्याचे दिवस कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून जास्त वेळ काम करून घेण्याची मुभा कंपन्यांना मिळणार होती. आता केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) यांनी अशाप्रकारे सुरू असणाऱ्या चर्चांना उत्तर दिलं आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारचा बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे गंगवार यांनी सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लोकसभेत केलं स्पष्ट केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना असं स्पष्ट केलं आहे की, कार्यालयांमध्ये आठवड्यातून 4 दिवस काम किंवा 40 तासाच्या कामाच्या व्यवस्थेबाबत कोणतीही योजना नाही आहे. कामगार मंत्री म्हणाले की, चौथ्या वेतन आयोगाच्या सूचनेच्या आधारे आठवड्यातून पाच दिवस आणि भारत सरकारच्या नागरी प्रशासकीय कार्यालयांमध्ये दररोज साडेआठ तास काम केले जाते. सातव्या वेतन आयोगाने (7th Pay Commission) देखील आपल्या शिफारशीत हे कायम ठेवले आहे. यापूर्वी अशी बातमी समोर आली होती की, नवीन कामगार कायद्यांनुसार, येत्या काही दिवसांत आठवड्यातून तीन दिवस सुट्टीची तरतूद केली जाऊ शकते. (हे वाचा- नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF मध्ये 5 लाखांपर्यंतची गुंतवणूक झाली TAX FREE ) अशी चर्चाच होती की केंद्र सरकार आठवड्यातून चार दिवस व तीन दिवस पगाराच्या सुट्टीचा पर्याय देण्याची तयारी करत आहे. हा पर्याय देखील नवीन कामगार संहितेच्या नियमात ठेवला जाईल, ज्यावर कंपनी आणि कर्मचारी परस्पर संमतीने निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. असेही म्हटले जात होते की नवीन नियमांनुसार सरकार कामकाजाचे तास 12 पर्यंत वाढवू शकते.