नवी दिल्ली, 28 जानेवारी: एम्प्लॉयीज स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी -ESIC) लाभार्थ्यांना आता 1 एप्रिलपासून 735 जिल्ह्यांमध्ये ईएसआय (ESI) योजनेअंतर्गत आरोग्य सेवा मिळणार आहेत. आतापर्यंत ही सेवा 387 जिल्ह्यांमध्येच मिळत होती. 187 जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणातच आरोग्य सेवा उपलब्ध होत्या तर 161 जिल्ह्यांमधील ESIC लाभार्थ्यांना कोणत्याच सुविधा मिळत नव्हत्या. ईएसआयसी सदस्यांना आरोग्य केंद्र किंवा एम्प्लॉयीज स्टेट इन्श्युरन्स कार्पोरेशनचा करार असलेल्या रुग्णालयांमध्येच उपचार घेता येत होते. आता पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत (ABPMJAY) ईएसआयसी लाभार्थ्यांना सर्वत्र आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. एम्प्लॉयीज स्टेट इन्शूरन्स कार्पोरेशनच्या स्थायी समितीचे सदस्य एस. पी. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी झालेल्या बैठकीत स्थायी समितीनं ईएसआयसी लाभार्थ्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी प्रस्तावित बजेटला मंजुरी दिली आहे. त्यामुळं ईएसआयसी सदस्यांना 1 एप्रिल 2021 पासून देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होतील. (हे वाचा- घरबसल्या अशाप्रकारे करा तुमचं PAN Card व्हेरिफाय, 2 मिनिटांत होईल काम ) नॅशनल हेल्थ अथॉरिटीबरोबर करार नवीन ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याकरता ईएसआयसीनं नॅशनल हेल्थ अथॉरिटीबरोबर (NHA) एक सामंजस्य करार केला असून, यामुळं ESIC लाभार्थ्यांना ABPMJAY पॅनेलच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा मिळेल. देशातील कोणत्याही ABPMJAY रुग्णालयात ESIC कर्मचाऱ्यांना सेवा मिळे. ही माहिती एस. पी. तिवारी यांनी दिली. ते ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटरचेही सदस्य आहेत. यासाठी ईसीआयसी स्थायी समितीनं बुधवारी झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष 2020-21 साठीच्या आर्थिक तरतुदीचा आढावा घेत, पुढील वर्षाच्या आर्थिक तरतुदीचाही निर्णय घेतला आहे, असंही तिवारी यांनी सांगितलं. (हे वाचा- Work From Home: कोरोनानंतरही मोठ्या संख्येने कर्मचारी करणार घरूनच काम- रिपोर्ट) अनेक रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवली जाईल ईएसआयसीच्या स्थायी समितीनं हरियाणातील बवल, बहादूरगड, तमिळनाडूतील त्रिपुर, उत्तरप्रदेशातील बरेली, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं 100 बेड्सची रुग्णालयं उभारण्याच्या बजेटला मंजुरी दिली आहे. याशिवाय नागपूरमधील बुटीबोरी इथं 200 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. इंदोरमधील नंदनगर रुग्णालयातील खाटांची संख्या 500 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. बिहारमधील फुलवारी इथल्या आणि पाटण्यातील 50 खाटांच्या रुग्णालयाची क्षमता 100 खाटांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. ईएसआयसी योजना काय आहे ? दरमहा 21 हजार किंवा त्यापेक्षा कमी पगार असणाऱ्या औद्योगिक कर्मचाऱ्यांचा (Industrial Workers) ईएसआयसी योजनेत समावेश होतो. दर महिन्याला त्यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापून घेऊन ती आरोग्य सुविधांसाठी जमा केली जाते. 0.75 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून तर 3.25 टक्के रक्कम कंपनीद्वारे जमा केली जाते.