New Delhi: Union Finance Minister Nirmala Sitharaman chairs a pre-budget meeting with industrialists, in New Delhi, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo/Subhav Shukla)(PTI12_19_2019_000082B)
नवी दिल्ली 31 जानेवारी : नरेंद्र मोदी सरकारचा पहिला बेजट उद्या 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. मे महिन्यात सत्तेवर आलेल्या मोदींच्या दुसऱ्या टर्ममधला हा पहिला पूर्ण बजेट आहे. देशात असलेलं आर्थिक मंदीसदृश्य वातावरण, जागतिक मंदी यामुळे घसरलेला विकासाचा दर या सगळ्या कारणांमुळे सरकारचा अर्थसंकल्प कसा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. गेले काही दिवस अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी चर्चा करून त्यांचं मत ऐकून घेतलंय. अर्थमंत्रालयाचे कर्मचारी गेली काही महिने या कामात दिवस रात्र व्यस्त असून एका अधिकाऱ्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतरही त्यांनी रजा न घेता ते बजेटच्या छपाईचं काम पूर्ण करत आहेत. कुलदीप कुमार शर्मा हे बजेटच्या छपाई विभागाचे प्रमुख आहेत. गेली 30 वर्ष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बजेटची पुस्तिका छापली जाते. अतिशय गोपनीय पद्धतीने हे काम केलं जातं. बजेट अर्थमंत्रालयाकडून पूर्ण झाल्यानंतर तो छपाईसाठी देण्यात येतो. ही सगळीच प्रक्रिया अतिशय गोपनीय असते. या कामात असलेल्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एका ऑफिसमध्ये ठेवलं जातं. त्या काळात त्यांचा आणि जगाचा काहीही संबंध येणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधता येत नाही. किंवा त्यांच्याशीही कुणी संपर्क साधू शकत नाही. बजेट हा अतिशय गोपनीय असतो. राज्य घटनेनुसार त्याची माहिती संसदेत बजेट ठेवण्याआधी दिली जाऊ शकत नाही.
त्यामुळे या अधिकाऱ्यांना अलिप्तपणे हे काम करावं लागतं. शर्मा यांच्या वडिलांचं 26 जानेवारीला निधन झालं. ही बातमी जेव्हा त्यांना कळविण्यात आली तेव्हा शर्मा यांनी अंत्यसंस्कारला न जाता काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
कारण गेली 30 वर्ष ते बजेटच्या छपाईचं अत्यंत महत्त्वाचं आणि जोखमीचं काम पूर्ण करत असतात. अतिशय कमी वेळात दर्जेदार छपाई करून या पुस्तिका 1 तारखेच्या सकाळपर्यंत तयार ठेवाव्या लागतात. त्यामुळे शर्मा यांनी आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा निर्णय घेत एक आदर्श घालून दिल्याचं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे.