मुंबई, 07 ऑक्टोबर : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रंगतदार घडामोडी घडल्या. विरोधकाला पराभूत करण्यासाठी दोन पक्षांनी केलेली छुपी युतीच उघड झाली. सत्ताधारी शिवसेना-भाजप एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. मात्र, आघाडीनं मनसेला उघडपणे सोबत घेतलं नाही. अर्थात आघाडी आणि मनसेत उघड युती झाली नसली तरी त्यांच्यात छुपी युती झाली. आघाडी आणि मनसेत अनेक मतदारसंघात छुपी युती असल्याचं पाहायला मिळतं आहे. दोन्ही बाजूंकडून वेगवेगळ्या मतदारसंघात एकमेकांसाठी माघार घेण्यात आली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात मनसेचे अधिकृत उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली असून राष्ट्रवादीच्या बाळासाहेब सानप यांना पाठिंबा दिला आहे. वेगळं लढून मतांची विभागणी टाळून विरोधकांनी त्यांची ताकद सानपांच्या पाठिशी उभी केली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या मनसेनं तसं पाहिलं तर इथं पुण्यातली परतफेड केली. पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील लढत आहेत. या मतदारसंघात मनसेचे किशोर शिंदे मैदानात उतरले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कोथरूडमध्ये मनसेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे इथली लढत लक्षवेधी ठरत आहे. ठाण्यातही विरोधकांच्या छुप्या युतीच्या एकीचा पॅटर्न पाहायला मिळतोय. ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुहास देसाईंनी त्यांचा अर्ज मागे घेतला. कल्याण ग्रामीण मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाणे शहरात भाजप मनसेत मुकाबला होत आहे. तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसे-शिवसेना यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. तर मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवींद्र पाटील आणि विनोद तराळ यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या रोहिणी खडसेंची लढत शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत होणार आहे. एकंदरीतच मुख्य शत्रूचा पाडाव करण्यासाठी दोन पक्षांनी दाखवलेलं सामंजस्य हे या निवडणुकीतलं वैशिष्ट्य म्हणता येईल. परिणामी छुपं युद्ध उघड झाल्यानं ही लढाई अधिकच रंगतदार होणार हे नक्की. ===================