भारतीय जनता पार्टीमध्ये मी अनेक वर्ष मेहनतीने काम केलं होतं, मात्र, भाजपमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली
मुक्ताईनगर, 24 सप्टेंबर : ‘अमित शहा यांची मी भेट घेतलेली नाही. मी अमित शहांना फोन केला होता फोनवर चर्चा झाली. ही चर्चा काही वैयक्तिगत कारणांनिमित्त होती. या भेटीबाबत शरद पवार यांना माहिती दिलेली होती’ असा खुलासा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते अमित शहांसोबत फोनवर चर्चा केल्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली आहे. अखेर एखनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. दिल्लीमध्ये अमित शहा यांची मी भेट घेतलेली नाही. मी अमित शहांना फोन केला होता. त्यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली आहे. ही भेट वैक्तिगत कारणासाठी होती. पवार साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की मी भेटीवेळी माझ्यासोबत असतील मग पवार साहेब म्हणणार नाहीत की, यांना भाजपमध्ये घ्या, या भेटीचा कोणताही अर्थ काढू नये, असा खुलासा खडसेंनी केला. (एकनाथ खडसेंची होणार घरवापसी? देवेंद्र फडणवीसांची एका ओळीत प्रतिक्रिया) भारतीय जनता पार्टीमध्ये मी अनेक वर्ष मेहनतीने काम केलं होतं, मात्र, भाजपमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली. अनेक खोट्या केसेस माझ्यावर लादण्यात आल्या त्यामुळे मी भाजप सोडलेला आहे. राष्ट्रवादीमध्ये मला सन्मानाने आमदारकी दिलेली आहे. भाजपमधून मी बाहेर गेलो होतो मात्र मला राष्ट्रवादीने मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादी त्यागकरणाचा प्रश्नच नाही, असं खडसेंनी स्पष्ट केलं. वेदांत फॉक्सकॉन सारखा मोठा प्रकल्प हा गुजरातमध्ये स्थलांतरित झाला नंतर आता फोन पे सारखा प्रकल्प हा कर्नाटकमध्ये स्थलांतरित होत आहे अमित शहा ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे संबंध आहेत. शिंदे साहेबांनी प्रतिष्ठापणाला लावून हे प्रकल्प थांबायला हवे होते. दुर्दैवाने आपले मुख्यमंत्री प्रकल्प महाराष्ट्रात थांबवण्यासाठी कमी पडत आहेत, अशी टीकाही खडसेंनी केली. (‘दसरा मेळाव्याला गुलाल उधळत या, पण…’, उद्धव ठाकरेंची सर्वात पहिली प्रतिक्रिया) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कालखंडापासून दसरा मेळाव्याची परंपरा सुरू आहे आताही उद्धव ठाकरे यांची सभा व्हावी अशी जनमानसांची इच्छा होती. हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल झालेली. हायकोर्टाने उचित असा निर्णय दिला त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं आहे, असंही खडसे म्हणाले.