JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिंदेंकडून 2014 लाच 'महाविकासआघाडी'ची ऑफर, अशोक चव्हाणांचा दावा, पण पवारांनीच काढली हवा?

शिंदेंकडून 2014 लाच 'महाविकासआघाडी'ची ऑफर, अशोक चव्हाणांचा दावा, पण पवारांनीच काढली हवा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2014 सालीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून घेऊन आले होते, असा दावा अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला होता, या दाव्याची हवाच शरद पवारांनी काढून घेतली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 3 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2014 सालीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून घेऊन आले होते, असा दावा अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. अशोक चव्हाण यांच्या या दाव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलं, तेव्हा असा प्रस्ताव आला नसल्याचं ते म्हणाले. ‘2014 ला शिवसेनेसोबतच्या सरकारचा कुठलाही प्रस्ताव आला असता तर मला समजलं असतं. अशोक चव्हाण काही बोलल्याचं मला तरी माहिती नाही. अशोक चव्हाण जे बोलले ते मी कधीही ऐकलं नाही. राष्ट्रवादीला जर कोणी असा प्रस्ताव दिला असता, तर मला थोडंतरी माहिती असतं. राष्ट्रवादीचे निर्णय घेण्याचा अधिकार पक्षातल्या इतर नेत्यांना असला तरीही ते माझ्या कानावर घालतात,’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. काय म्हणाले होते अशोक चव्हाण? काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी, माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. काँग्रेसकडून टार्गेट राष्ट्रवादी ‘2014 ला शिवसेनेशी चर्चा झाली होती, अशोक चव्हाण खोटं बोलत नाहीत. जर 2014 साली राष्ट्रवादीने भाजपला आधीच बाहेरून पाठिंबा जाहीर केला नसता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्यामुळे तो विषय पुढे जाऊ शकला नाही. राष्ट्रवादीशिवाय सरकार बनणं शक्य नव्हतं, त्यामुळे तिथेच सगळं थांबलं,’ असं वक्तव्य काँग्रेसचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलं होतं. 2014 साली राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा 2014 साली भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष वेगळे लढले होते. निवडणुकीनंतर भाजप हा 122 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. निवडणुकीचे निकाल लागत असतानाच महाराष्ट्रात स्थिर सरकार असावं म्हणून भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता. यानंतर भाजपने आवाजी मतदानाने विधानसभेत बहुमत सिद्ध केलं होतं. निवडणुकीत दुसरा मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतपद मिळालं. एकनाथ शिंदे यांचीच विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली, पण काही महिन्यांमध्येच भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेसोबत युती केली, ज्यामुळे शिवसेनेला मंत्रिपदं मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या