राज ठाकरे आणि अमित शाह यांचा फाईल फोटो
मुंबई, 28 सप्टेंबर : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित अनेक संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या कारवाईवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केलं आहे. “अशी कीड जेव्हा जेव्हा तयार होईल तेव्हा तेव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “PFI ह्या देशविघातक आणि देशद्रोही संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली. ह्याचं मी मनापासून स्वागत करतो. पुढे सुद्धा अशी कीड जेव्हा जेव्हा तयार होईल तेव्हा तेव्हा ती तात्काळ समूळ नष्ट करायला हवी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ह्यांचं अभिनंदन”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. गेल्या आठवड्यात पुण्यात पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाईच्या विरोधात काही तरुणांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं होतं. राज ठाकरे यांनी पाकिस्तान विषयी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवरच थेट बंदी घातली आहे. ( PFI ची उत्पत्ती कशी झाली? केंद्र सरकारने का घातली बंदी? संघटनेचा A टू Z इतिहास ) राज ठाकरे याआधी पीएफआयबद्दल नेमकं काय म्हणाले होते? “एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली… थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले होते. “माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील ( पा ) उच्चारता येणार नाही ! नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले होते.