बारामती, 29 मे: राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA Government) आल्यापासून भाजप नेत्यांकडून (BJP Leader) सातत्याने सरकार पाडण्याची भाषा केली जात आहे. अलीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ‘लोकं झोपेत असताना कधीही सरकार पडेल’ अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकारातील अनेक नेत्यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही (Ajit Pawar) पलटवार करण्यात मागे राहिले नाहीत. त्यांनी शेलक्या शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. ‘लोक झोपेत असताना सरकार पडणार’ हे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी जागं असताना केलं होतं की झोपेत केलं होत? असा सवाल अजित पवारांनी विचारला आहे. ते शनिवारी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात ज्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार आलं आहे. तेव्हापासून भाजप नेत्यांच्या पोटात दुखत आहे. आपण सरकारमध्ये नाहीत, हे त्यांना सतत बोचत आहे. अशात कार्यकर्त्यांनी सोबत राहावं, यासाठी ते काही ना काही बोलत राहतात. त्यामुळे जोपर्यंत महाविकास आघाडी सरकारातील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत हे सरकार टिकणार, असंही पवार यावेळी म्हणाले. हे वाचा- ओबीसी समाजाला मोठा धक्का, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण अखेर रद्दच! काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, ‘लोकं झोपेत असताना कधीही आघाडी सरकार पडेल.’ 18 महिन्यांपूर्वी सत्तेत आल्यापासूनच महाविकास आघाडी सरकारची स्थिती कुठल्याही क्षणी सरकार पडेल अशी आहे. त्याचदिवशी त्यांनी बॅगा भरून ठेवल्या आहेत. कोविडचा प्रकोप म्हणा किंवा त्याचं नशीब यामुळे हे सरकार 18 महिने टिकलं आहे. हे वाचा- आघाडी सरकार झोपेत निर्णय घेत नाही, तुम्ही स्वप्नातच आनंद घ्या, मलिकांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दादा झोपेत असताना, अचानक राज्यातील सरकार कोसळलं होतं. असंच अचानक आणखी एकदा सरकार पडेल आणि कोणाला काहीही कळणार नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर नवाब मलिक, जयंत पाटलांसह राज्यातील अन्य नेत्यांनीही चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला होता.