नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांचे कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत शाह-पाटील यांच्या भेटीची माहिती दिली आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील याबाबतची माहिती दिली आहे. “चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्त्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली”, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. पण या भेटीमागे अनेक कारणं असल्याच्या शक्यता आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या निवडणुकांच्या तयारीबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.
हेही वाचा : मोठी बातमी ! विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतच होणार
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीची येत्या फेब्रुवारी महिन्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे भाजपकडूनही आगामी निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवरच अमित शाह यांचा पुणे दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हेही वाचा : मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, ‘या’ उमेदवाराने घेतली माघार
राज्यातील अनेक मोठ-मोठ्या शहरांमधील महापालिका निवडणुकींची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली सारख्या अनेक शहरांचा समावेश आहे. या महापालिका निवडणुका पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण महापालिका निवडणुकींमध्ये जो कल येईल तोच कल कदाचित त्या निवडणुकींमध्ये येण्याची शक्यता असते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजप नेतेही आपली रणनिती आखत आहेत.