मुंबई, 28 जून : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रमुख नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपने महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केली आहे. भाजपने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. तसंच या पत्रासोबत सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा दाखलाही देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. भाजपने या पत्रामध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांचंही नाव घेतलं आहे. काय आहे भाजपच्या पत्रात? - भाजपा-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या. परंतू निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. - शिवसेनेत गेल्या 8-9 दिवसांपासून अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे आणि त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आता आघाडी नको आहे. शिवसेनेचे 39 आमदार ही आघाडी संपुष्टात येण्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत गमावले आहे. - दुसरीकडे शिवसेनेच्या या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यांचे 40 मृतदेह गुवाहाटीतून परत येतील, असे जाहीरपणे राज्यसभा सदस्य संजय राऊत सांगत आहेत. शिवाय शिवसेनेचे इतरही नेते अशाच प्रकारची धमकीयुक्त भाषा वापरत आहे. यासंदर्भात सर्व पुरावे सोबत जोडले आहेत. - संसदीय लोकशाहीत सभागृहातील बहुमत ही सर्वोच्च बाब असल्याने आणि त्याशिवाय, ते सरकार अस्तित्त्वात राहू शकत नसल्याने तातडीने मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, ही माझी राज्यपालांकडे विनंती आहे.