'द केरळ स्टोरी'वरुन नसिरुद्दीन शाह आणि मनोज तिवारीमध्ये वाद
मुंबई, 2 जून- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या ‘द केरळ स्टोरी’ वरील वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. अभिनेत्याने चित्रपटाच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘द केरळ स्टोरी’ हा एक धोकादायक ट्रेंड असल्याचं म्हटलं आहे. नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, हा चित्रपट पाहण्याचा माझा कोणताही विचार नाही. कारण मला हा चित्रपट बघायचा नाहीय. नसिरुद्दीन शाह यांनी म्हटलं, - ‘मी हा चित्रपट पाहिला नाही आणि पाहण्याचा माझा विचारही नाही. कारण मी आतापर्यंत याबद्दल बरंच काही वाचलं आहे’. दरम्यान आता भोजपुरी अभिनेता आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मनोज तिवारी यांनी ‘द केरळ स्टोरी’वरील त्यांच्या वक्तव्यावरुन नसीरुद्दीन शाह यांच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना काही अडचण असल्यास ते न्यायालयात जाऊ शकतात असंही म्हटलं आहे. मनोज तिवारी यांनी सुदीप्तो सेन यांच्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचं उघड समर्थन केलं आहे. एका टीव्ही चॅनलशी झालेल्या संवादात त्यांनी या चित्रपटावर होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आणि नसीरुद्दीन शाह यांना त्यांच्या वक्तव्यावरुन निशाण्यावर घेतलं आहे. Swara Bhasker Pregnancy: खरंच लग्नाच्या चार महिन्यांत बाळाला जन्म देणार स्वरा भास्कर? उघड झालं सत्य आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना मनोज तिवारी म्हणाले- ‘नसीरुद्दीन शाह खूप चांगले अभिनेते आहेत. पण त्यांचा हेतू स्पष्ट नाही. हे मी अत्यंत दुःखाने सांगत आहे. नसीर साहेब, जेव्हा या देशात चित्रपट बनले आणि दाखवले गेले की किराणा दुकानात बसलेला प्रत्येक व्यापारी समोरुन जाणाऱ्या मुलीकडे घाणेरड्या नजरेने पाहतो. तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाही. मनोज तिवारी पुढे म्हणाले- ‘केरळची कथा सत्यघटनेवर आधारित आहे. हा चित्रपट एफआयआरवर आधारित आहे. तुम्हाला याबाबत काही अडचण असेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. द काश्मीर फाइल्स आणि द केरळ स्टोरी हे तथ्यांवर आधारित चित्रपट आहेत हे तुम्ही नाकारु शकता. बोलणं सोपं आहे. पण त्यांनी दिलेली प्रस्तावना भारतीय म्हणून अजिबात चांगली नाही’. असं मनोज तिवारींनी म्हटलं आहे.
काय होतं नसिरुद्दीन शाह यांचं वक्तव्य? नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे, ‘भिड, अफवाह आणि फराज सारखे सक्षम चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. हे चित्रपट पाहण्यासाठी कोणीही चित्रपटगृहात गेले नाही. पण, लोक द केरळ स्टोरी पाहण्यासाठी सिनेमा हॉलमध्ये जात आहेत. मी हा चित्रपट पाहिला नाही किंवा पाहण्याचा माझा विचारही नाही, कारण मी याबाबत बरंच वाचलं आहे. हा एक धोकादायक ट्रेंड आहे. आपण नाझी जर्मनीच्या दिशेने चाललो आहोत यात शंका नाही. जिथे हिटलरच्या काळात सर्वोच्च नेत्याच्या माध्यमातून चित्रपट निर्मात्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जेणेकरुन ते सरकारची स्तुती करु शकतील.तेव्हा ‘ज्यू समुदायाकडे तुच्छतेने पाहिले जात होते. अनेक दिग्गज जर्मन चित्रपट निर्माते देश सोडून हॉलिवूडमध्ये गेले आणि तेथे चित्रपट बनवले. आता भारतातही तेच घडत आहे. एकतर तुम्ही बरोबर आहात, किंवा तटस्थ किंवा शक्ती समर्थक. नसीरुद्दीन शाह यांनी असंही म्हटलं आहे की, आता काही चित्रपटांचा प्रचार आणि चुकीच्या माहितीसाठी वापर केला जात आहे.