मुंबई, 23 जून- महाराष्ट्रात सध्या राजकीय खळबळ ( Maharashtra Politics Crisis) उडाली आहे. शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीने शिवसेना पक्ष हादरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालथीमुळे संतप्त झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने या मुद्द्यावर ट्विट करून आपलं मत मांडलं आहे. स्वरा भास्करच्या (Swara Bhaskar) या ट्विटवर सोशल मीडियावर आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच वादात अडकत असते. ती सतत विविध ट्विट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. स्वरा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी प्रत्येक ज्वलंत विषयावर आपलं मत मांडत असते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत केलेल्या एका ट्विटमुळे ती चर्चेत आली आहे. स्वरा भास्करने ट्विट केलंय, ज्यामध्ये तिने महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळावर संताप व्यक्त केला आहे.या ट्विटमध्ये तिने लिहलंय - ‘काय मूर्खपणा चालला आहे! आपण मत देतोच का… निवडणुकांऐवजी दर 5 वर्षांनी बंपर सेल लावा…’ #MaharashtraPoliticalTurmoil
स्वरा भास्करचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. या ट्विटवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिच्या ट्विटचं समर्थन केलं आहे. तर काहींनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर दाखल झाले आहेत. काही ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत. तर दुसरीकडे गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनामध्ये असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.