नाशिक, 29 जुलै : शैक्षणिक आयुष्यात दहावीचा टप्पा हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे दहावीची परीक्षा पास होणे हे सर्वांचे पहिले ध्येय असते. पण, दहावीची परीक्षा पास होण्यासाठी जर 16 वर्ष लागली तर? दचकू नका, नाशिकमधील निलेश भास्कर बोराडे सोबत हा प्रकार घडला आहे. अखेर 16 वर्षांनंतर निलेश दहावी पास झाला आहे. कष्ट,जिद्द,चिकाटी आणि परिश्रम करण्याची ताकद असली तर कोणताही माणूस यश संपादन करू शकतो हे सिद्ध करून दाखविले आहे घोटीतील एका जिद्दी युवकाने. स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेऊन नावलौकिक करणाऱ्या या युवकाचे शिक्षण अवघे सातवीपर्यंत झाल्याने मनी देशसेवेची इच्छा असणाऱ्या युवकाला सैन्यात जाण्यापासून वंचित रहावे लागत होते. मात्र, त्याने मोठ्या जिद्दीने दहावीची परीक्षा देऊन घवघवीत यश मिळविल्याने सैन्यात जाण्याचा मार्ग सुकर बनविला आहे. घोटीतील राष्ट्रीय धावपट्टू वयाच्या तिसाव्या वर्षी दहावीत 65 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याने देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने राष्ट्रीय धावपट्टू निलेश भास्कर बोराडे याचे कुटुंबाय आनंदी झाले आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने निलेशने सातवीत शिक्षण सोडावे लागले. मातीखाण काम करून दररोज 30 किलोमीटर मुंबई नाशिक महामार्गावर अनेकांना धावतांना कसरत करत तब्बल चौदा वर्षांनी दहावीत घवघवीत यश संपादन केले. देशाच्या अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी होत, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत धावणारी आंतरराष्ट्रीय धावपट्टू सुपी सुपिया हिच्या बरोबर धुळे ते कसारा 230 किलोमीटर अंतरावर साथ दिली. जम्मू काश्मीर,दार्जिलिंग, गुहाटी, कारगिल यांसह देशाच्या विविध राज्यात मॅरेथॉनमध्ये निलेशने भाग घेत देशाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख निर्माण केली. विविध स्पर्धेच्यामाध्यमातून आत्ता पर्यंत बारा हजार पाचशे किलोमीटर धावण्याचा विक्रम त्याने केला आहे. यातून अनेक गोल्ड मेडल मिळवले आहे. अखेर दहावी पास झाल्यामुळे निलेशला लष्करात भरती होण्याची संधी मिळाली आहे.