नवी दिल्ली, 29 जून : रस्ते वाहतूक मंत्रालयाने सध्याच्या कार मॉडेलमध्ये पुढील सीटसाठी दोन एअरबॅगची (Airbag) अनिवार्यता चार महिन्यांपर्यंत पुढे ढकलली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंबंधी माहिती देताना, Covid-19 चा देशभरातील प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. सध्याच्या कार मॉडेलसाठी केवळ ड्रायव्हर सीट एअरबॅग अनिवार्य आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत फ्रंट पॅसेंजर एअरबॅगची अनिवार्यता पुढे ढकलण्यात आली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्यूफॅक्चरर्सने वेळ मागितला असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं. येणाऱ्या नव्या कार्स मॉडेलसाठी एअरबॅग असणं आधीपासूनच अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2021 आणि त्यानंतर निर्मित होणाऱ्या वाहनांमध्ये आणि सध्याच्या मॉडेलसाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत ड्रायव्हरसह पुढील सीटवर बसणाऱ्या व्यक्तीसाठीही एअरबॅग असणं अनिवार्य करण्यात आलं. परंतु आता ही अनिवार्यता पुढे ढकलण्यात आली आहे. एखाद्या दुर्घटनेत प्रवाशांच्या सुरक्षिततेत सुधारणा करणाऱ्या उद्देशाने हे पाउल उचलण्यात आलं आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात दरवर्षी जवळपास 80 हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. हा आकडा जगात होणाऱ्या रस्ते अपघातांपैकी 13 टक्के आहे. कारमधील सेफ्टी फीचर्सचा अभाव हे रस्ते अपघातात मृत्यूचं सर्वात मोठं कारण आहे. त्यामुळे मंत्रालयाने 1 एप्रिलपासून नव्या कारमध्ये एअरबॅग अनिवार्य केलं आहे.
कारमध्ये देण्यात येणारा एअरबॅग पातळ नायलॉनच्या कपड्यापासून बनलेला असतो. जो कारमध्ये गरजेनुसार फीट केला जातो. एखाद्या दुर्घटनेवेळी यामुळे सुरक्षितता निर्माण होते.