अंत्यसंस्काराशी संबंधित स्टार्टअपनं वेधलं लक्ष
मुंबई, 22 नोव्हेंबर : कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं हा कोणत्याही कुटुंबीयांसाठी दुःखद प्रसंग असतो. अशा प्रसंगी कुटुंबीय दुःखासोबत तणावातदेखील असतात. अंत्यसंस्कार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्याचा ताण कुटुंबीयांवर असतो. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे निधन झालेल्या व्यक्तीच्या पश्चात कोणी नातेवाईक नसतील, तर अशा व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी अनेक प्रश्न निर्माण होतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एका स्टार्टअपने अनोखं `बिझनेस मॉडेल` तयार केलं आहे. ही कंपनी अंत्यसंस्काराशी निगडित सर्व सेवा प्रदान करते. सध्या कोणत्या तरी कंझ्युमर फेस्टिव्हलमधल्या या कंपनीच्या स्टॉलचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांच्यासह अनेक युझर्सनी हा फोटो शेअर केला आहे. शरण यांनी या फोटोशी संबंधित प्रश्न उपस्थित केले असून, त्यावर नेटिझन्सनी कमेंट्सही केल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या एका स्टार्टअपच्या अनोख्या बिझनेस मॉडेलचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत सुखान्त फ्युनेरल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड असं कंपनीचं नाव दिसत आहे. ही कंपनी अंत्यसंस्काराशी संबंधित सेवा प्रदान करते. एका इव्हेंटमध्ये या कंपनीचा स्टॉल होता आणि त्यातून त्या कंपनीचं प्रोफाइलही दिसून येत आहे. शोकाकुल नातेवाईकांना दिलासा आणि तणावमुक्त करण्यासाठी मुंबईतली ही कंपनी सर्व विधी आणि जबाबदाऱ्या सांभाळेल, असं या कंपनीच्या वेबसाइटवर म्हटलं आहे. ही कंपनी रुग्णवाहिका सेवा, तसंच अंत्यसंस्कारासाठी आवश्यक साहित्याची व्यवस्था करते आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी साह्य करते, असंदेखील वेबसाईटवर म्हटलं आहे. `आमची टीम अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारते. यासाठी सुमारे 38 हजार रुपये शुल्क आकारलं जातं. तसंच अस्थिविसर्जनासाठीदेखील आम्ही मदत करतो,` असं इव्हेंटमधल्या किऑस्कवर उपस्थित असलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलं. वाचा - OMG! सूर्यावर दिसला चक्क फिरता साप: VIDEO पाहून शास्त्रज्ञही झाले हैराण दरम्यान, या कंपनीबाबत आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक ट्विट केलं आहे. `अशा स्टार्टअपची गरज का पडली असेल?` असा सवाल शरण यांनी ट्विटमध्ये केला आहे. या प्रश्नावरून इंटरनेटवर मतमतांतरं दिसून येत आहेत. एका युझरने ट्विट करून, `भविष्यात भाडेतत्त्वावरचे नागरिक अंत्ययात्रेसाठी येतील, असं माझ्या कुटुंबातल्या एका व्यक्तीनं एकदा म्हटलं होतं. आता ही गोष्ट खरी होताना दिसत आहे. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे,` असं म्हटलं आहे.
`काही जण एकटे असतात. त्यांची देखभाल करायला कुटुंबात कोणीही नसतं. त्यामुळे ते अशा प्रकारच्या पर्यायाची निवड करू शकतात,` असं काही जणांनी म्हटलं आहे. `अशा प्रकारची अंत्यसंस्काराशी निगडित सेवा अमेरिकेत उपलब्ध आहे. ही संकल्पना भारतासाठी नवीन असल्याने लोकांना आश्चर्य वाटतं,` असं आणखी एका युझरने म्हटलं आहे.