भारतीयांच्या मदतीने तुर्की नागरीक भारावले
नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी पहाटे झालेल्या 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने दोन्ही देशांमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत 5100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 21000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी भारताने दोन विमानांद्वारे मदत साहित्य आणि वैद्यकीय पथक पाठवले आहे. यानंतर तुर्कस्तानच्या नागरिक देखील भारतीयांचे आभार मानायला विसरले नाही. भारताने तुर्कस्तानमधील भूकंपग्रस्त भागात ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी विविध उपकरणे पाठवली आहेत. भारताने पाठवलेल्या शोध आणि बचाव कर्मचार्यांचा एक गट, विशेष प्रशिक्षित श्वान पथक, ड्रिल मशीन, मदत सामग्री आणि औषधे घेऊन तुर्कीच्या एडनमध्ये दाखल झाले. भारताकडून तातडीने पाठवलेल्या या मदतीबद्दल तुर्कीने आभार मानले आहेत. तुर्कस्तानचे भारतातील राजदूत फिरत सुनेल यांनी न्यूज18 हिंदीशी विशेष संवाद साधताना सांगितले की, ‘मला खूप आनंद झाला आहे की भूकंपानंतर काही तासांतच भारताने या संकटात मदत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली आणि बचाव पथके तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला. आता आपण तुर्कीमध्ये भारतीय पथक पाहू शकतो, जे तेथे बचाव कार्यात मदत करत आहेत. वाचा - तुर्कस्तानची जमीन अजूनही थरथरतेय; आतापर्यंत 100 हून अधिक आफ्टरशॉक; घटनेचे दाहक फोटो भारताला मित्र असल्याचे सांगताना तुर्कीचे राजदूत म्हणाले, ‘भारतासाठी माझा एकच शब्द आहे, मित्र… मित्र एकमेकांना मदत करतात. आणि इथे भारताने तुर्कस्तानला मदत केली. जर आपण एखाद्याला मित्र मानले तर नेहमीच असे घडते. आम्ही मित्र आहोत, म्हणून आम्ही एकमेकांना मदत करतो. फिरत सुनेल म्हणाले, ‘या प्रकरणी भारताची मदत खूप महत्त्वाची आहे, कारण भूकंपानंतरची सुरुवातीची वेळ शोध मोहिमेसाठी खूप महत्त्वाची असते आणि या प्रकरणात भारताची प्रतिक्रिया अतिशय जलद होती.’
तुर्कस्तानमधील सद्यस्थितीची माहिती देताना ते म्हणाले, ‘पहिल्यांदा 7.7 आणि नंतर 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तेव्हापासून आतापर्यंत 300 हून अधिक आफ्टरशॉक बसले आहेत. त्यांनी सांगितले की, या आपत्तीत 21 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत आणि परिसरातील तीन विमानतळांचेही नुकसान झाले आहे. यासोबतच या परिस्थितीला सामोरे जाणे सोपे नसल्याचेही त्यांनी सांगितले. 14 हजारांहून अधिक अधिकारी आणि 5 हजाराहून अधिक लष्करी जवान मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.