JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / विराट-रोहितमध्ये वादाची ठिणगी, BCCI उचलणार मोठं पाऊल, टीम इंडियातली Inside Story

विराट-रोहितमध्ये वादाची ठिणगी, BCCI उचलणार मोठं पाऊल, टीम इंडियातली Inside Story

विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma Rift) यांच्यातल्या वादाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना याचे संकेत देत आहेत. यानंतर आता बीसीसीआयने (BCCI) या वादात उडी घेतली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 डिसेंबर : विराट कोहली आणि रोहित शर्मा (Virat Kohli Rohit Sharma Rift) यांच्यातल्या वादाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना याचे संकेत देत आहेत. कोहली मुंबईमध्ये असूनही टीमच्या क्वारंटाईनमध्ये एक दिवस उशीरा आला, तर त्याआधी रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून (India vs South Africa) बाहेर झाला. यानंतर विराट कोहलीने वनडे सीरिजमधून माघार घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं. याच सीरिजपासून रोहित शर्मा भारतीय वनडे टीमचा पूर्णवेळ कर्णधार होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळलेले नाहीत, त्यामुळे दोघांमधल्या वादाच्या चर्चांना उधाण आलं आहे. वनडे टीमची कॅप्टन्सी काढून घेतल्यामुळे विराटही नाराज असल्याचं बोललं जात आहे. बीसीसीआय या संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे, तसंच बोर्ड या प्रकरणाला हलक्यात घेत नाही. दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर दोन्ही कर्णधारांसोबत चर्चा होईल, अशी माहिती आता समोर आली आहे. विराट कोहलीला सोमवारीच मुंबईत टीमच्या बायो-बबलमध्ये यायचं होतं, पण त्याने आपण एक दिवस उशीरा येणार असल्याचं बीसीसीआयला सांगितलं. यानंतर रोहित शर्माने दुखापतीमुळे आपण टेस्ट सीरिज खेळणार नसल्याचं बीसीसीआयला सांगितलं. यानंतर विराटनेही आपण दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज खेळणार नसल्याचं बीसीसीआयला सांगितल्याचं वृत्त समोर आलं. मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस असल्यामुळे विराट वनडे सीरिज खेळणार नसल्याचं सांगितलं गेलं, पण पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विराटने अजून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना याबाबत अधिकृत काहीच सांगितलेलं नाही. या सगळ्या प्रकरणावर बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्टशी संवाद साधला. ‘विराटने त्याला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवणं हलक्यात घेतलेलं नाही. कौटुंबिक कारणाचा दाखला विराटने दिला आहे, पण यामागचं कारण समजायला कोणीही एवढं भोळं नाही. जे सुरू आहे, ते अजिबात स्वीकारलं जाऊ शकत नाही,’ असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. बीसीसीआयने रोहित आणि विराट यांच्यामध्ये वाद नसल्याचं याआधीही अनेकवेळा अमान्य केलं. पण आता बीसीसीआय आणि निवड समितीने विराटला हटवून रोहितला वनडेचं कर्णधार करणं आणि मग टेस्ट टीमचंही उपकर्णधार करणं, हा एक मोठा संदेश दिल्याचं मानल जात आहे. ‘दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर आम्ही दोन्ही कर्णधारांसोबत बसू आणि या मुद्द्यावर तोडगा काढू. विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवणं टीमच्या चांगल्यासाठी होतं. कोहलीने अशाप्रकारे वागणं योग्य नाही. विराटने टीमसाठी खूप काही केलं आहे आणि तो टीमला कायमच पुढे ठेवेल. जे सुरू आहे, ते खूप दुर्दैवी आहे. टीमचं यामुळे नुकसान होऊ नये. विराट आणि रोहित टीमचे सर्वोत्तम खेळाडू आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये ते टीमसाठी महत्त्वाचे आहेत, त्या दोघांना एकत्र यावं लागेल आणि ते दोघं हे नक्कीच करतील,’ असं बीसीसीआय अधिकारी म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या