टोकयो, 24 जुलै : महाराष्ट्राचा तिरंदाज प्रवीण जाधव (Pravin Jadhv) याने शेवटच्या राऊंडमध्ये केलेल्या चुकीचा मोठा फटका भारताला बसला. तिरंदाजीच्या मिश्र गटात प्रवीण आणि भाराताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीचा (Deepika Kumari) यांचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला. दक्षिण कोरियाच्या जोडीनं भारतीय जोडीचा 6-2 असा पराभव केला. या मॅचमध्ये पहिले दोन सेट कोरियानं जिंकल्यानंतर भारतानं जिंकत तिसरा सेट पुनरागमन केलं होतं. चौथ्या सेटमध्येही भारतानं आघाडी टिकवली होती. शेवटच्या क्षणी प्रवीणचा खराब फटका भारतीय टीमसाठी भारी ठरला. प्रवीणला शेवटच्या क्षणी फक्त 6 पॉईंट्स मिळाले. ही खराब कामगिरी भारताच्या पराभवाचं कारण ठरली.
यापूर्वी प्रवीण-दीपिका जोडीनं तैवानच्या जोडीचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. या जोडीनं तैवानच्या चिया एन लिन आणि चिह चून तांग यांचा पराभव केला. तैवानच्या जोडीनं पहिला सेट 36-35 नं जिंकला. त्यामुळे त्यांना दोन पॉईंट मिळाले. दुसरा सेट 38-38 नं बरोबरीत सुटला. दुसऱ्या सेटनंतर तैवानकडं 3-1 अशी आघाडी होती. त्यामुळे भारतीय जोडीसमोर खडतर आव्हान होते. मुंबईचे आधारस्तंभ होणार इंग्लंडला रवाना, जखमी खेळाडूंची घेणार जागा प्रवीण-दीपिका जोडीनं तिसरा सेट 40-35 नं जिंकत ही सामना 3-3 नं बरोबरीत आणला. चौथ्या आणि शेवटच्या सेटमध्ये भारतीय जोडीनं दमदार प्रदर्शन करत 37-36 असा विजय मिळवला. हा सेट जिंकताच भारतानं हा सामना 5-3 नं जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर भारताच्या पदकाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र दक्षिण कोरिया विरुद्धच्या लढतीमध्ये फॅन्सना निराशा सहन करावी लागली.