क्रिकेट विश्वावर शोककळा! भारताच्या माजी कसोटीवीर सुधीर नाईक यांचं निधन
मुंबई, 5 एप्रिल : बुधवारी भारतीय क्रिकेट विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी कसोटीवीर आणि मुंबई संघाचे माजी कर्णधार सुधीर नाईक यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. सुधीर नाईक हे भारतीय क्रिकेट विश्वातील एक मराठमोळा चेहेरा होते. त्यांनी भारताकडून 1974 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी 3 कसोटी आणि 2 वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वनडे क्रिकेट सामन्यात पहिल्यांदा चौकार मारणारे सुधीर हे पहिले क्रिकेटर ठरले होते. त्यांनी बराच काळ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर क्युरेटर म्हणून देखील काम पहिले.
सुधीर नाईक यांनी मुंबईच्या क्रिकेट संघासाठी रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. मुख्य म्हणजे 1970-71 मध्ये त्यांनी मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती . घरात पाय घसरून पडल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. आज त्यांचे निधन झाले असून क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.