मुंबई, 1 जून : सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा (BCCI President) राजीनामा दिल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं, पण या वृत्तात काहीही तथ्य नसल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी दिली आहे. काही वेळापूर्वी दादाने एक ट्वीट केलं होतं, ज्यावरून त्याने बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, पण जय शाह यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. रविवारी झालेल्या आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये सौरव गांगुली उपस्थित होता, मग अचानक त्याने राजीनामा का दिला? असा प्रश्न चाहत्यांना पडला. जय शाह यांच्या या ट्वीटमुळे दादाच्या चाहत्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
काय म्हणाला होता सौरव गांगुली? ‘1992 साली माझ्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरूवात झाली. 2022 मध्ये आता याला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हापासून क्रिकेटने मला बरंच काही दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडून मला पाठिंबा मिळाला. या प्रवासात मला पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार. त्यांच्या मदतीमुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मी आजपासून काहीतरी नवीन सुरू करण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे अनेकांना मदत मिळेल. आयुष्याच्या नव्या पर्वात तुमच्या सगळ्यांचा असाच पाठिंबा मिळत राहिल, अशी आशा करतो,’ असं ट्वीट गांगुलीने केलं.
2019 साली सौरव गांगुलीची बीसीसीआय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, त्याआधी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता.