Team India Head Coach
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर: टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) अखेरच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने नामिबियाचा (India vs Namibia) पराभव करत शेवट गोड केला. नामिबियाविरुद्धच्या सामना विराट कोहलीचा (Virat Kohli) कर्णधार म्हणून तर रवी शास्त्रींचा (Ravi Shastri) कोच म्हणून अखेरचा सामना ठरला. रवी शास्त्रींचा कार्यकाळ टी-20 वर्ल्ड कपनंतर संपणार होता. दरम्यान संघाला अलविदा करताना त्यांनी खेळाडूंना खास कानमंत्र दिला आहे. 70 सेकंदाचा हा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. वी शास्त्री टीम इंडियाचा निरोप घेत असताना भारतीय संघांच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण भावूक झालं होतं. यावेळी रवी शास्त्रींनी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना मिठी मारली. वास्तविक, रवी शास्त्रीसोबतच या दोघांचाही कार्यकाळ संपला आहे. रवी शास्त्रींनी आपल्या 70 सेकंदांच्या संदेशाने टीम इंडियाच्या खेळाडूंना जातानाही उत्साही करण्याचे काम केले. या संदेशाद्वारे त्यांनी त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. ज्या संघांविरुद्ध भारताने यापूर्वी कधीही विजय मिळवला नव्हता अशा देशांना भारताने त्यांच्या देशात जाऊन हरवल्याचं सांगून संघाचं कौतुक केलं.
एक संघ म्हणून मी माझ्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. गेल्या काही वर्षांत तुम्ही जगभरातील प्रत्येक मोठ्या संघाला, प्रत्येक फॉरमॅटमध्ये पराभूत केले आहे. ही कामगिरी तुम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी सर्वोत्तम संघांच्या पंक्तीत आणते. माझ्यासाठी हा संघ महान आहे. निकाल सर्वांसमोर आहेत." तसेच ते पुढे म्हणाले, आयसीसीचे विजेतेपद आपण जिंकू शकलो नाही, याची मला खंत वाटत राहील. मात्र त्याचवेळी आपला या संघावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. हा संघ संधीचे सोने करेल. खेळाडू अनुभवातून शिकतील आणि जिंकतील.
पण, माझ्यासाठी, तुम्ही आव्हानांवर मात कशी करता यापेक्षा तुम्ही आयुष्यात काय मिळवता हे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही ज्या समस्यांशी लढलात, मग ते कोरोना सारखी परिस्थीती असोत किंवा आणि काही. तुम्ही सर्वांना लढलात आणि मानसिकदृष्ट्या मजबूत झालात तसेच उत्तम क्रिकेट खेळलात. टीम इंडियाची हीच गोष्ट मला आवडते. असे मत शास्त्री यांनी यावेळी व्यक्त केले. रवी शास्त्री यांच्या ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या निरोपाचा आणि त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, शास्त्री यानी या छोट्याशा संदेशानंतर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला आणि सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला मिठी मारुन निरोप घेतला.