मुंबई, 11 एप्रिल : गेल्या सहा महिन्यात अनेक प्रमुख खेळाडू जखमी झाल्यानं टीम इंडियाच्या (Team India) बेंच स्ट्रेंथबद्दल जगाला माहिती झाली आहे. या काळात ज्या तरुण खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी त्याचं सोनं केलं. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, टी. नटराजन आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. ऋषभ पंतनं (Rishabh Pant) देखील जोरदार पुनरागमन केलं आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) जखमी झाल्यानं ऋषभला दिल्ली कॅप्टिल्स (Delhi Capitals) टीमचं कॅप्टन करण्यात आलं आहे. पंतनं पहिल्याच मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव केला आहे. दिल्लीनं चेन्नईचा 7 विकेट्सनं पराभव करत या आयपीएलची सुरुवात दमदार केली. मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचा या विजयात प्रमुख वाटा होता. पृथ्वी शॉ याने चेन्नईच्या एकाही बॉलरला सोडलं नाही. त्यानं अगदी सुरुवातीलाच दीपक चहरला सिक्स लगावत धोनीच्या टीमला इशारा दिला. पाचवी ओव्हर टाकायला आलेला मुंबईकर शार्दुल ठाकुरवरही पृथ्वी चांगलाच बरसला. त्यानं त्याच्या एकाच ओव्हरमध्ये तीन सलग फोर लगावले. पृथ्नीनं चेन्नईविरुद्ध फक्त 38 बॉलमध्ये 72 रन काढले. इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) पृथ्वीची बॅटींग पाहून चांगलाच प्रभावित झाला आहे. पृथ्वीची बॅटींग पाहिल्यानंतर वॉननं ट्विट केलं आहे. “भारतीय क्रिकेटमध्ये असमान्य प्रतिभा आहे. त्यांनी एका युगापर्यंत वरचढ असायला हवं. भारत सहज 2 टीम तयार करु शकतो.” असं भविष्य वॉननं व्यक्त केलं आहे.
(वाचा : टीम इंडियाला मिळाला नवा ‘Captain Cool’, पहिल्याच मॅचमध्ये केली गुरूवर मात ) टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ अन्य कोणत्याही देशांपेक्षा सध्या चांगली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये याचा प्रयत्य आला. टीम मॅनेंजमेंटसमोर सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ही आयपीएल संपल्यानंतर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.