जयपूर, 17 नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात (India vs New Zealand 1st T20) बुधवारी जयपूरमध्ये (Jaipur Weather Update) तीन टी-20 मॅचच्या सीरिजमधली पहिली मॅच खेळवली जाणार आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडल्यानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) ही जबाबदारी देण्यात आली आहे, तर केन विलियमसननेही (Kane Williamson) या सीरिजमधून विश्रांती घेतल्यामुळे टीम साऊदीकडे न्यूझीलंडचं नेतृत्व देण्यात आलं आहे. टेस्ट सीरिजची तयारी करण्यासाठी विलियमसनने टी-20 सीरिजमधून ब्रेक घेतला आहे. हा मुकाबला संध्याकाळी 7 वाजता जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे आता भारताला रोहितच्या नेतृत्वात नवी सुरुवात करावी लागणार आहे. टी-20 फॉरमॅटचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहितचा हा पहिलाच सामना असेल, दुसरीकडे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्याही नव्या इनिंगला याच सामन्यापासून सुरुवात होईल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. जयपूरमध्ये मात्र पाऊस पडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मॅच संध्याकाळी होणार असल्यामुळे तापमान 15-20 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल. जयपूरमध्ये पावसाचा अंदाज नसला तरी धुकं पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे टॉस पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. टी-20 वर्ल्ड कपमध्येही धुक्यामुळे आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीमचा सर्वाधिक वेळा विजय झाला. दिल्लीमधल्या प्रदुषणामुळे राजस्थानही प्रभावित झालं आहे. हा चिंतेचा विषय नसावा, असं भारताचा ओपनर केएल राहुलने आधीच स्पष्ट केलं आहे. मॅच जशी पुढे सरकत जाईल, तसं जयपूरमधलं तापमानही कमी होईल. सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी बॅटिंगसाठी अनुकूल आहे, त्यामुळे या सामन्यात मोठ्या स्कोअरची अपेक्षा आहे.