Photo-BCCI
धर्मशाला, 26 फेब्रुवारी : विराट कोहलीनंतर (Virat Kohli) रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाचा (Team India) कर्णधार करण्यात आलं आहे. रोहितला पूर्णवेळ टीमचा कर्णधार केल्यानंतर भारताने सगळे सामने जिंकले आहेत. भारताने पहिले न्यूझीलंडचा तीन टी-20, वेस्ट इंडिजचा 3 टी-20 आणि 3 वनडे तसंच आता श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) पहिल्या टी-20 मध्ये असा लागोपाट 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला. या तिन्ही टीमविरुद्ध भारताने नवोदित खेळाडूंना संधी दिली, पण डावखुरा स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) अजूनही संधीच्या प्रतिक्षेत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कुलदीपला खेळवण्यात आलं, पण त्याला अजूनही टी-20 मध्ये संधी देण्यात आलेली नाही. 2019 वर्ल्ड कपनंतर कुलदीप यादव टीम इंडियाच्या बाहेर गेला. विराट कोहली कर्णधार असताना त्यानेही कुलदीपवर विश्वास दाखवला नाही. तसंच दुखापतींमुळेही कुलदीपला काही काळ बाहेर बसावं लागलं. आता रोहितने कुलदीपवर विश्वास दाखवला असला तरी त्याला टी-20 साठी प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मध्ये रोहितने संधी दिली तर कुलदीपच्या संकटात सापडलेल्या करियरलाही आधार मिळेल. धोनी (MS Dhoni) टीममध्ये असताना त्याने कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या जोडीचा वापर योग्य पद्धतीने केला. या दोन्ही स्पिनरनी मधल्या ओव्हरमध्ये टीमला विकेट मिळवून दिल्या, पण धोनीच्या निवृत्तीनंतर दोघांच्या बॉलिंगमध्ये तशी धार दिसली नाही. युझवेंद्र चहलने यानंतर टीम इंडियात पुनरागमन केलं, पण कुलदीप यादव मात्र अजूनही संघर्ष करताना दिसत आहे. कुलदीप यादव भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे, त्याला 7 टेस्टमध्ये 26 विकेट मिळाल्या आहेत, तर 22 टी-20 मध्ये त्याला 41 विकेट घेण्यात यश आलं. 65 वनडेमध्ये कुलदीपने 107 विकेट घेतल्या. तर आयपीएलच्या 45 सामन्यांमध्ये त्याला 40 विकेट घेण्यात यश आलं. टी-20 फॉरमॅटमध्ये कुलदीपचा इकोनॉमी रेट 8 पेक्षा कमी असला तरीही त्याला खेळण्याची संधी मिळत नाहीये. आयपीएलच्या या मोसमात कुलदीप दिल्लीकडून खेळणार आहे.