Photo-BCCI
बर्मिंघम, 5 जुलै : एजबॅस्टन टेस्टमध्ये टीम इंडियाने इंग्लंडला (India vs England 5th Test) 378 रनचं आव्हान दिलं. हे आव्हान इंग्लंडने अगदी सहज पार केलं. जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांच्या नाबाद शतकी खेळींच्या जोरावर इंग्लंडने टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातलं त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान यशस्वीरित्या गाठलं. भारताची बॉलिंग बघता इंग्लंडला हे आव्हान कठीण जाणार असं वाटत होतं, पण चौथ्या दिवसाच्या अखेरपर्यंत इंग्लंडने मॅचवरची पकड मजबूत केली. आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने दिवसाअखेरीस 3 विकेट गमावून 259 रन केले, ज्यामुळे त्यांना पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 गरज होती. पाचव्या दिवशी टीम इंडिया आक्रमक रणनिती घेऊन मैदानात उतरेल असं वाटत होतं, पण झालं उलटंच. टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पाचव्या दिवसाची पहिली ओव्हर मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) दिली. बुमराह स्वत:च पहिली ओव्हर टाकेल, असं वाटत होतं कारण त्यानेच चौथ्या दिवशी इंग्लंडला दोन धक्के दिले होते. बुमराहच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. मोहम्मद सिराजला दिवसाची पहिली ओव्हर दिल्यामुळे कर्णधार जसप्रीत बुमराहच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसंच सोशल मीडियावरून बुमराहवर मोठ्या प्रमाणावर टीकाही करण्यात येत आहे. सिराजला दिवसाची पहिली ओव्हर देण्याचा निर्णय चुकीचा होता, कारण तो खूप रन देतो, असं एक यूजर म्हणाला. तर हा निर्णय टीम मॅनजमेंटचा असेल, पण कर्णधार ऋषभ पंत असता तर ट्रोलर्स त्याच्या मागे लागले असते, असं आणखी एक यूजर म्हणाला.
मोहम्मद सिराजने दिवसाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन दिले, पण इनिंगच्या 67 व्या ओव्हरमध्ये जो रूटने सिराजला फोर मारून शतक पूर्ण केलं. या ओव्हरमध्ये एकूण 9 रन आल्या, ज्यात दोन फोरचा समावेश होता. जो रूटचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 28वं शतक आहे. याचसोबत तो केन विलियसमन, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याही पुढे गेला आहे. जो रूटने नाबाद 142 तर बेयरस्टोने नाबाद 114 रनची खेळी केली.