विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीचं शतक, श्रेयस अय्यरचं अर्धशतक आणि गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीची महत्त्वाची भूमिका राहिली. या विजयानंतरही भारतासमोर वेगळीच डोकेदुखी आहे.
धोनीचा वारसदार म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं त्या ऋषभ पंतची फलंदाजी सध्या डोकेदुखी ठरत आहे. पंत लवकर बाद होतो ही समस्या नसून चुकीचे फटके खेळतो तो चिंतेचा विषय आहे. त्रिनिदादमध्ये पंतला ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर क्रॉस बॅट शॉट मारणं महागात पडलं. तो 20 धावांवर त्रिफळाचित झाला. पंत टी20 मध्ये पहिल्या दोन सामन्यात दुहेरी धावसंख्या गाठू शकला नव्हता. अखेरच्या सामन्यात त्यानं अर्धशतक केलं होतं.
वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताची आघाडीची फळी निष्प्रभ ठरली होती. त्यावेळी शिखर धवनची उणीव संघाला भासली. मात्र, आता पुनरागमन केलेल्या धवनला गेल्या चार सामन्यात 2,3,23 आणि 1 अशा धावा काढता आल्या आहेत. धवनची लय बिघडली असून ही बाब संघासाठी आणि त्याच्यासाठीसुद्धा चांगली नाही.
भारताची सुरुवात चांगली झाली तरी अखेरच्या षटकात फलंदाजी ढेपाळते. विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 40 षटकांत 3 बाद 212 धावा झाल्या होत्या. त्यानंतर फक्त 67 धावांची भर घातली आणि यासाठी भारतानं 4 गडी गमावले. आघाडीच्या फलंदाजांनी धावा केल्यानंतरही अखेरच्या 10 षटकांत फटकेबाजी करण्यात मधल्या फळीला अपयश येत आहे.
भारतासाठी सध्या चौथ्या क्रमांकाची डोकेदुखी कायम आहे. सध्या ऋषभ पंत या स्थानावर खेळत असून त्याला टी20 च्या तिसऱ्या सामन्यातील अर्धशतक वगळता मोठी खेळी करता आलेली नाही. भारताला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मधल्या फळीत खेळणाऱ्या श्रेयस अय्यरनं पाचव्या क्रमांकावर दमदार कामगिरी करत अर्धशतक केलं.