भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजची तिसरी टेस्ट इंदूरमध्ये झाली. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 9 विकेटने विजय झाला. या सीरिजमध्ये भारताने 2-1 ची आघाडी घेतली आहे, त्यामुळे अहमदाबादमध्ये होणारी टेस्ट निर्णायक ठरणार आहे. या टेस्टमध्ये विजय मिळवत टीम इंडिया एकाच बाणात दोन शिकार करण्यासाठी मैदानात उतरेल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर लागोपाठ चौथ्यांदा कब्जा करून लागोपाठ दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहोचण्याची संधी भारताला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये आतापर्यंत स्पिनरची जादू चालली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या स्पिनरनी बॅटरना त्रास दिला आहे. इंदूर टेस्टमध्ये तर नॅथन लायनने दुसऱ्या इनिंगमध्ये 8 विकेट घेतल्या. भारतीय टीमच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये असा स्पिनर आहे ज्याने अहमदाबाद टेस्टच्या एका मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये त्याने 5-5 विकेट घेतल्या आहेत.
टीम इंडियाचा स्पिनर अक्षर पटेलला आतापर्यंत सीरिजमध्ये एवढी बॉलिंग करण्याची संधी मिळाली नाही. अनुभवी आर.अश्विन आणि रवींद्र जडेजाला कर्णधार रोहित शर्माने जास्त बॉलिंग दिली. सीरिजच्या पहिल्या तीन टेस्टमध्ये अक्षर पटेलच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियन बॅटर फार खेळले नाहीत, ज्याचा फायदा रोहित घेऊ शकतो. रणनीती म्हणून कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविडने अक्षरला फार बॉलिंग दिली नसण्याचीही शक्यता आहे.
अक्षर पटेलचं होम ग्राऊंड अहमदाबाद आहे, या मैदानात अक्षरचं रेकॉर्डही घातक आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या 2 टेस्टमध्ये अक्षर पटेलने 20 विकेट घेतल्या आहेत. फेब्रुवारी 2021 साली झालेल्या टेस्ट सीरिजच्या पहिल्या इनिंगमध्ये अक्षरने 5 विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 6 विकेट घेतल्या. मार्च महिन्यात झालेल्या टेस्टमध्ये अक्षरने पहिल्या इनिंगमध्ये 4 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट नावावर केल्या.
अक्षर पटेलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये तीनही सामन्यात बॅटिंगने टीम इंडियाची लाज वाचवली आहे. अक्षरने पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकं केली, तर तिसऱ्या टेस्टमध्येही तो नाबाद राहिला. अक्षर पटेलने या सीरिजमध्ये नवव्या क्रमांकावर बॅटिंग केली आहे. अक्षरने या सीरिजमध्ये विराट, पुजारा, स्मिथ आणि लाबुशेन यांच्यापेक्षा जास्त रन केल्या आहेत.