हिंदू धर्मात सकाळ-संध्याकाळ तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. तुळशीच्या वनस्पतीचा आयुर्वेदात औषध म्हणूनही उपयोग होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये तुळशीचे असे काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, जे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. दिल्लीचे ज्योतिषी पंडित आलोक पंड्या यांनी तुळशीच्या काही ज्योतिषीय उपायांबद्दल सांगितलेली माहिता पाहुया.
तुळशीच्या पानांचे उपाय - इच्छा पूर्तीसाठी - आपली काही मनातील इच्छा असेल, जी तुम्ही अनेक दिवसांपासून मनात दाबून ठेवत आहात. ती पूर्ण करण्यासाठी रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी तुळशीची 11 पाने व्यवस्थित तोडा. ही पानं चांगली धुवून थोडावळ सुकवा, त्यानंतर हनुमानाला अर्पण केलेल्या केशरी सिंदूरात थोडं तेल मिसळा आणि त्यानं तुळशीच्या पानांवर श्रीराम नाव लिहा आणि या पानांची माळ बनवा आणि बजरंगबलीला अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा. श्रद्धेनुसार, असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होते, असे मानले जाते.
शांतता आणि समृद्धीसाठी - घरात अशांततेचे वातावरण असेल तर तुळशीची चार-पाच पाने घेऊन धुवून स्वच्छ करा. यानंतर स्वच्छ पाण्यानं भरलेले पितळेचे भांडे किंवा कोणतेही भांडे घेऊन त्यात तुळशीची पाने टाकून ठेवा. दररोज स्नान केल्यानंतर हे पाणी घराच्या दारात शिंपडा. असं केल्यानं घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते, असे मानले जाते.
जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर यासाठी तुळशीची पाने लाल रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या घरातील पैशाच्या ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या पाकिटातही ठेवू शकता. असे केल्याने आर्थिक संकट लवकर दूर होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
नशीबाची साथ मिळण्यासाठी - तुम्ही हातात घेतलेल्या कामांमध्ये यश मिळत नसेल आणि नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर त्यासाठी पिठाचा दिवा बनवा आणि त्यात चिमूटभर हळद टाका आणि संध्याकाळी तुळशीसमोर लावा. हा दिवा तुळशीच्या मुळांमध्ये उत्तर दिशेला ठेवल्यास नशीब साथ देते आणि अडकलेली कामंही होऊ लागतात, असे मानले जाते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)