एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उद्घाटन सोहळा दोन टप्प्यात होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक विधीने होईल त्यानंतर मान्यवर नवीन इमारतीतील लोकसभा आणि राज्यसभा सभागृहाच्या परिसराची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी कनिष्ठ सभागृहात राष्ट्रगीताने सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (सर्व फोटो ANI)
संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळील छत्रामध्ये आयोजित केलेल्या विधीने या समारंभाची सुरुवात होईल. यात पीएम मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यासह ज्येष्ठ मंत्री सहभागी होणार असल्याचे समजते.
धार्मिक विधीनंतर कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहाच्या परिसराची पाहणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लोकसभेच्या दालनात सभापतींच्या खुर्चीशेजारी पवित्र 'सेंगोल' अर्थात राजदंड स्थापित करण्यात येणार आहे.
एका विधीनंतर 'सेंगोल' स्थापित केले जाईल, ज्यासाठी तामिळनाडूचे पुजारी आणि मूळ डिझाइन करणारे कारागिर उपस्थित असतील.
सकाळी साडेनऊच्या सुमारास पहिला टप्पा संपल्यानंतर दुपारनंतर दुसरा टप्पा सुरू होईल. या टप्प्यादरम्यान, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचे भाषण होईल, ते राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांचा लिखित अभिनंदन संदेश वाचतील. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा लेखी संदेशही वाचण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान मोदी एक नाणे आणि शिक्का जारी करतील. यावेळी त्यांचे भाषणही होणार आहे. त्यानंतर महासचिव लोकसभेच्या कामकाजाच्या समारोपासाठी आभार मानतील.
एएनआयच्या वृत्तानुसार, यावेळी संसद भवनाचे मुख्य वास्तुविशारद बिमल पटेल, उद्योगपती रतन टाटा, चित्रपट कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.
नवीन संसद भवनामध्ये संपूर्ण भारताचे सार आहे. संकुलाच्या आतल्या प्रत्येक कोपऱ्याला वेगवेगळ्या भारतीय राज्यांचे वैशिष्ट्ये साकारण्यात आलं आहे.
सागवान लाकूड नागपूरमधून मागवण्यात आले होते. तर इमारतीभोवतीच्या बांधकामासाठी दगड राजस्थान, नोएडा आणि उत्तर प्रदेशातून आणण्यात आले होते.
राज्यसभा सभागृहात बसवलेला लाल ग्रॅनाइट अजमेरमधील लाखा येथून आणला आहे. तर पांढरा संगमरवर राजस्थानमधील अंबाजीतून आणला होता.
या कार्यक्रमात एकूण 25 राजकीय पक्षांनी आपला सहभाग निश्चित केला आहे.
एआयएडीएमके, अपना दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेनेचा शिंदे गट, एनपीपी आणि एनपीएफ हे काही सहभागी पक्ष एनडीएचे मित्रपक्ष आहेत.