सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेला संघर्ष तूर्त तरी संपेल असे वाटत नाही. अशा परिस्थितीत सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहे. इजिप्त, फ्रान्स आणि इतर देशांच्या मदतीने या सर्व अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
फ्रान्सने बचाव मोहिमेअंतर्गत काही भारतीय नागरिकांसह 28 देशांच्या नागरिकांना हिंसाचारग्रस्त सुदानमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम केले. भारताने ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या लोकांची पहिली तुकडीही पाठवली आहे. पहिल्या तुकडीत 278 लोक आहेत जे सुदान बंदरातून INS सुमेधमधून रवाना झाले आहेत.
ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी मंगळवारी रवाना करण्यात आली. INS सुमेधा सुदान बंदरातून भारतीयांच्या पहिल्या तुकडीसह जेद्दाहला रवाना झाली.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी सांगितले की, युद्धग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे.
परराष्ट्र मंत्री म्हणाले की, सुदानमधील आपल्या सर्व लोकांना मदत करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. सध्या सुदानमध्ये राहणाऱ्या 3000 हून अधिक भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती देण्यात आली की, INS सुमेधा मधील 278 लोकांना सुदान बंदरातून जेद्दाहला पाठवण्यात आले आहे. हे सर्व भारतीय सुदानमध्ये अडकले होते.
सुदानच्या गृहयुद्धात आतापर्यंत 413 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर या संघर्षात 3551 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने देखील सर्व आकडेवारीची पुष्टी केली आहे. सुदानच्या संघर्षात किमान 9 मुले ठार आणि 50 हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत येथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील फ्रेंच दूतावासाने सोमवारी सांगितले की, भारतासह 28 देशांतील 388 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. फ्रान्सचे बचावकार्य सुरू असल्याचे दूतावासाने ट्विट केले आहे.
सोमवारी रात्री दोन लष्करी विमानांद्वारे भारतीय नागरिकांसह 28 देशांतील 388 लोकांना बाहेर काढण्यात आले. या मोहिमेदरम्यान किती भारतीयांना बाहेर काढण्यात आले याची माहिती मिळालेली नाही.
एका उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुदानमधून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी योजना आखण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याशी सुदानमधील परिस्थितीवर चर्चा केली.