पावसाळयात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण निसर्गरम्य ठिकाणे शोधात असतात. दरम्यान ही ठिकाणे आपल्या जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याला लागून असतील तर दगदग कमी होते आणि निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ घालवता येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि ठाणे जिल्ह्याला लागून असलेली काही ठिकाणे सांगणार आहोत.
ठाणे शहरालगत असलेले येऊर : ठाणे शहराला लागूनच येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाणे स्थानकात उतरून येथे जाण्यासाठी ठाणे महापालिकेच्या बसेस असून रिक्षा देखील जातात. टीकुजीनी वाडी येथील दारातून प्रवेश केल्यानंतर येथे जाता येते किंवा शिवाई नगरचा मार्ग देखील येऊरच्या जंगलाकडे नेतो.
बदलापूर जवळील कोंडेश्वर : पावसाळयात कोंडेश्वर हे अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे. या ठिकाणी शंकराचे मंदिर देखील आहे. येथे डोंगर आणि धबधबे असल्याने अनेक पर्यटक येथे गर्दी करतात.
धनगर धबधबा : बदलापूरहून कोंडेश्वरकडे जाताना भोज धरणाच्या आधी डावीकडे वळावे. रस्ता थोडा कच्चा आहे. स्वतःची गाडी आवश्यक आहे. सरळ गेल्यावर टेकडीच्या पायथ्याशी गाडी लावावी लागते. तेथून अर्धा तासाचा चढ चढून गेल्यावर आपण पठारावर पोहोचतो. या पठारावर गेल्यावर गावातातून जातानाच पाण्याचा आवाज ऐकू येतो. हळुहळू उंचावरून कोसळणारा धबधबा नजरेस पडतो.
बारवी धरण : अंबरनाथ तालुक्यात बदलापूर-मुरबाड रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेले बारवी हे धरण बदलापूरपासून 16 किमी आणि मुरबाडपासून 13 किमी अंतरावर आहे. या धरणाची ओळख ठाणे, नवी मुंबई आणि रायगड (काही भाग) या जिल्ह्यांची तहान भागवणारे धरण अशी आहे. दोन मोठ्या डोंगरामध्ये वसलेल्या बारवी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर अतिशय आकर्षक असे रूप पाहण्यासाठी पर्यटक हजेरी लावत असतात. बारवी जंगल सफारी आणि बारवी धरण पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी होते.
पळसदरी धबधबा : रेल्वेच्या खोपोली रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेले गाव पावसाळी पिकनिक साठी एक उत्तम ठिकाण असून पर्यटकांचा आवडता स्पॉट आहे. येथून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे डोंगरावर पसरलेली हिरवाईची झालर जवळच असलेल्या सोनगिरी किल्ला यामुळे हा स्पॉट पिकनिक आणि ट्रेकर्स साठी एकदम चर्चेत असतो. विशेष म्हणजे या गावात असणारा स्वामींचा मठ देखील प्रसिद्ध असून अनेक भाविक येथे गर्दी करतात.
डोंबिवली येथील मलंगगड : डोंबिवली स्थानकात उतरल्यानंतर मलंगडला जाण्यासाठी रिक्षा आहेत. ह्या रिक्षा थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जातात. नंतर पायऱ्या चढून या गडावर जावे लागते आणि वरती गडावर मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे. डोंगर असल्याने आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात अतिशय निसर्गरम्य दिसतो तसेच डोंगर चढताना मध्ये मध्ये छोटे छोटे झरेही लागतात.
कोंडाणा लेणी : कर्जत गावापासून साधारणतः 10 किमी अंतरावर कोंदिवडे गाव आहे आणि या गावात जाण्यासाठी संपूर्ण रस्ता आजही उल्हास नदीच्या काठावरून गेलेला आहे. तिथे जाताना डाव्या बाजूला ढाक बहिरीचा गड दर्शन देतो, तर समोर किल्ले राजमाची दिसायला सुरुवात होते. कोंदिवडे गाव सोडले की, कोंडाणे गाव येते. त्यानंतर आपण सह्याद्रीच्या पायथ्याला पोहोचतो. हीच वाट पुन्हा लेण्यांपर्यंत जाते.